मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा लावण्याची घोषणा केल्यानंतर अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात राणा दाम्पत्याला मोठा झटका मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे.
खासदार नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या रिट याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.
यावेळी न्यालयाने राणा दाम्पत्याला खडे बोल सुनावले. राणा दाम्पत्य हे लोकप्रतिनिधी असल्याने सामाजिक व राजकीय जीवनात दावा करतात. मग त्यांनी अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. मोठी सत्ता ही मोठ्या जबाबदारीसोबतच येते, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी जबाबदारीने वागायला हवे, ही किमान अपेक्षा आहे…”, असं महत्त्वाचं निरीक्षण न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने नोंदवलं.
दरम्यान राणा दाम्पत्याच्या वागण्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती, या पोलिसांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचंही न्यायालयाने म्हटलं.