मुंबई – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर सामनातून देखील भाष्य करत भाजपसह शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला. भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची काही विधाने ट्विट करत ही एक “औरंगजेबी” चाल तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला आहे.
उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन चाकी सरकार आल्यापासून नियोजनबध्द कट रचलाय ? म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवार यांची आज सामनाने पाठराखण केलेय ? या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून “अण्णाजी पंत” यांनी लिहीलेय? असे सवाल उपस्थित करत आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे. यासोबतच शेलार यांनी विरोधीपक्षनेते अजित पवार,जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांच्या विधानांचा दाखल देत जोरदार टीका केली आहे.
◆मा. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन चाकी सरकार आल्यापासून नियोजनबध्द कट रचलाय?
◆ म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवार यांची आज सामनाने पाठराखण केलेय?
◆या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून “अण्णाजी पंत” यांनी लिहीलेय?
2/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 3, 2023
शिंदे फडणवीस सरकार महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राज्यपालांवर कधी तरी बोलणार का असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला होता.”काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला ‘टकमक टोकाकडे’ घेऊन जात आहेत ! आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे.असा इशारा देखील शेलार यांनी ट्विटद्वारे दिला आहे.
◆ काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला “टकमक टोकाकडे” घेऊन जात आहेत !
◆ आपल्या राजकीय स्वार्थासाठी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे.
3/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 3, 2023
काय म्हटलंय नेमकं सामनात
“छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक धोरणांवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो.
त्याच स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी इतिहासातील सगळय़ात मोठा त्याग व बलिदान केले. एखादा तपस्वी व धर्मवीरच असे बलिदान करू शकतो.
त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत, राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात हीच खरी गंमत आहे. आधी शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय?” अशी शाब्दिक फटकेबाजी सामनातून करण्यात आली होती.