कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चारच दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील पहिल्या ‘वंदे भारत ट्रेन’चे लोकार्पण केले होते. आपल्या आईच्या अंत्यसंस्कारानंतर मोदींनी या रेल्वेला हिरवा कंदील दाखवल्याने त्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुकही झाले होते. मात्र चार दिवसानंतर लगेच ही दुर्दैवी घटना घडली आहे.
हावड़ा ते न्यू जलपाईगुड़ी या मार्गावर धावणाऱ्या या रेल्वेवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली आहे. मालदा येथे ट्रेनसोबत ही दुर्घटना घडली.
दगडफेकीत सुदैवाने कुठल्याही प्रवाशांना इजा झाली नाही. मात्र, गाडीच्या काचा फुटल्याचे दिसून आले. या फुटलेल्या काचा रेल्वे कोचमधील खुर्चीवरही पडल्याचे पाहायला मिळाले.
पूर्व भारतमधील ही पहिलीच ‘वंदे भारत ट्रेन’ आहे. जी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ४ दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आली आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तसेच, प्रवाशांनाही धीर देण्याचे काम केले.