कोल्हापूर – देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला असून नागरिकांना पुराचा फटका सहन करावा लागत आहे, अशी टीका पर्यावरण अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी टीका केली आहे.
त्या कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत होत्या. मेधा पाटकर म्हणाल्या, पूररेषा आणि नदीची पाणीपातळी यामधील फरक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळाला नाही. त्यामुळे त्यांनी क्रेडाईने पूर रेषेच्या बाबतीत दिलेला अहवाल स्वीकारला.
शिवाय निळा आणि लाल रेषेतील बांधकामांना सरसकट सूट दिली. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पुराचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर जाऊन पर्यावरणासंदर्भात मोठमोठी वक्तव्ये करत आहेत. मात्र त्याच वेळी देशात काय परिस्थिती सुरू आहेत याकडे मात्र दुर्लक्ष आहे, अशी देखील टीका त्यांनी केली.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून महापूराची तीव्रता वाढली आहे. या सर्वाला पूररेषेच्या बाबतीत बेजबाबदारपणे निर्णय घेणारे देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. त्यामुळे किमान आतातरी पूर रेषेची नव्याने आखणी करणे गरजेचे आहे. अशी मागणी मेधा पाटकर यांनी केली आहे. नद्यांमधील गाळ आणि वाळू काढून खोलीकरण करणे हे पूर्णत: अशास्त्रीय आहे. यातून केवळ ठेकेदारांचे भले होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
रायगड, चिपळून, कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या महापुराने भविष्यातील धोक्याचा इशारा दिला आहे. केवळ सरकारच सर्व प्रश्न सोडवेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. आता यामधील अभ्यासकांनी अधिक लक्ष घालून पर्यावरणाची संरचना लक्षात घेऊन नियंत्रणासाठीचे शाश्वत उपाय अंगीकरण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.