मुंबई – मुंबई आणि पुण्याऐवजी राज्यांतील अन्य छोट्या शहारांमध्ये आयटी उद्योग प्रकल्प उभारले गेल्यास त्याला राज्य सरकारकडून मोठ्या सवलती दिल्या जातील अशी माहिती राज्याचे मंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. मुंबईत इंडियन मर्चंट चेंबर्सच्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, नागपुर, अमरावती, लातूर, सातारा अशा शहरांमध्ये हे उद्योग उभारण्यास वाव आहे.
ते म्हणाले की पुणे, मुंबई आणि औरंगाबाद ही शहरे आता आयटी हब शहरे झाली आहेत. या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाचाहीं लाभ या क्षेत्रातील कंपन्यांना झाला आहे.
आता यापुढे दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये हे उद्योग विस्तारण्यासाठी संबंधीत कंपन्यांना मोठ्या सवलती राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या उद्योगांना छोट्या शहरांमध्ये वीज व अन्य पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या जातील.
महाराष्ट्राच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने लोकांच्या आरोग्य विषयक गरजांसाठी तंत्रज्ञावर आधारीत एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे योजले आहे अशी माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले की, आम्ही स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना रूग्णालये आणि क्लिनीक्सशी जोडणार आहोत, त्या आधारे काही मिनीटांमध्ये संबंधीतांना आरोग्य विषयक मदत उपलब्ध होऊ शकणार आहे.
आम्ही राज्यातील बारा हजार ग्राम पंचायती 25 जिल्हे आणि शहरे ऑप्टीकल फायबरने जोडली आहेत. त्याद्वारे महानेट आणि भारतनेट तर्फे तेथे वेगवान इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सेवा वेगाने विस्तारण्यासाठी आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांनी राज्य सरकारला सुचना केल्यास त्याचेही स्वागत केले जाईल असेही मंत्र्यांनी सांगितले.