पिरंगुट – पुणे – कोलाड या मार्गावरील कामे अपूर्ण आहे. परिणामी कंपनीच्या हलगर्जीपणामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असून लवकरात लवकर दुरुस्ती करून अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी भूगावच्या सरपंच निकिता सणस यांनी केली आहे. 24 जानेवारीच्या आत कामे पूर्ण झाली नाहीत तर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच निकिता सणस यांनी दिला आहे.
पुण्याहून कोकणला जाण्यासाठी सोपा व जवळचा मार्ग म्हणून या मार्गाचा वापर केला जातो. गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याचे काम चालू आहे; मात्र कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक ठिकाणी कामे रेंगाळली आहेत. परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. येणाऱ्या – जाणाऱ्या प्रवाशांना व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, रोडवेज कंपनीला यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या वेळी सरपंच निकिता रमेश सणस, उपसरपंच सतिश इंगवले, सदस्या वैशाली चोंधे, उद्योजक रमेश सणस, नितीन शेडगे, संकेत कांबळे आदी उपस्थित होते.
पुणे – कोलाड मार्गावरील भूगाव येथील तलावाजवळ रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तलावापासून राम नदीपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी भराव टाकालेला नाही. भूगाव गावातील रस्त्यावर दुभाजक बसविणे. पाणी वाहून जाण्यासाठी तलाव ते राम नदीपर्यंत विविध ठिकाणी पाइप बसवावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.