शिक्रापूर – शिक्रापूर येथे ग्रामपंचायतीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. येथे दोन पॅनलच्या माध्यमातून दुरंगी लढत होत आहे. गावातील वॉर्ड क्रमांक एकमधून शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलचे उमेदवार रिंगणात आहेत.
या उेमदवारांना समस्यांची जाणीव असून सर्व उमेदवार सुशिक्षित असल्याने शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलच्या सर्व उमेदवार विजयाची संधी असल्याचा विश्वास माजी सरपंच आबासाहेब करंजे यांनी व्यक्त केला. यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांसह मतदारांचा देखील प्रचंड उत्साह वाढला आहे.
शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक एकमधून मयूर खंडेराव करंजे, वंदना रमेश भुजबळ व सारिका उत्तम सासवडे हे तिघे उच्चशिक्षित असलेले अधिकृत उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. ते त्यांच्या वॉर्ड क्रमांक एकमधील क्षितीज विहार, करंजे नगर, दाभाडे कॉलनी यांसह आदी भागातून प्रचार करत आहेत. शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलचे प्रमुख तसेच माजी सरपंच आबासाहेब करंजे यांनीही प्रचारात भाग घेतला.
ते म्हणाले, शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलचे उमेदवार हे सुशिक्षित असून प्रत्येक उमेदवाराला पूर्वीपासून समाजकारणाचा वसा लाभलेला आहे. सर्व उमेदवारांना वॉर्डातील समस्यांची जाणीव आणि गावातील समस्या सोडविण्याची तळमळ आहे. त्यांच्या कर्तृत्वावर सर्व कामे ते मार्गी लावू शकतात. यापूर्वी त्यांनी अनेक सामाजिक कार्य करत विकासकामांसाठी आवाज उठविलेला आहे.
त्या सामाजिक कामांच्या जोरावर नक्कीच विजय मिळवू शकतात, असा आम्हाला विश्वास आहे.
उमेदवार मयूर करंजे म्हणाले, गावातील युवकांना स्पर्धा परीक्षा देता याव्यात यासाठी अद्यावत ग्रंथालय उभारणार आहोत. शिक्रापूर गावाला सुरळीत व अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
वंदना भुजबळ म्हणाल्या, गावातील बेरोजगार युवकांना परिसरातील कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. गावामध्ये आधुनिक सार्वजनिक शौचालये उभारणार आहोत.
सारिका सावडे म्हणाल्या, गावामध्ये मंजूर झालेली शुद्ध पाणी पुरवठा योजना विस्कळीत झालेली असून ती पूर्ण क्षमतेने विकसित करण्यात येईल. ग्रामपंचायतमध्ये यापूर्वी झालेला भ्रष्टाचार आणि अनियमितता याची संबंधित विभागामार्फत चौकशी करण्यात येईल.
जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे म्हणाल्या, गावातील समस्यांचा विचार करता ग्रामविकास आघाडी पॅनलचे उमेदवार निश्चितच गाव विकासाच्या मार्गाने घेऊन जातील. तिघेही उमेदवार आणि सर्व कार्यकर्ते देखील गावातील मतदारांच्या मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विजय आमचाच होणार असल्याचा दावा करीत आहेत.