नवी दिल्ली – ओला, उबेर सारख्या प्रवासी वाहन पुरवठादार कंपन्या विरोधात ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. भाडे किती असावे, ऐनवेळी ते किती वाढवावे, बुकींग रद्द केल्यानंतर काय शुल्क असावे, त्याचबरोबर ग्राहकाच्या माहितीची साठवणूक कशी केली जाते या संदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की अनेकदा गाडीचा चालक ग्राहकांना बुकिंग स्वीकारल्यानंतर ते कॅन्सल करण्यास सांगतात. त्यामुळे ग्राहकांना कॅन्सलेशनसाठी दंड आकारला जातो. एकूणच तक्रारीसंदर्भात यावेळी चर्चा केली जाणार आहे.एकाच गाडीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना दोन व्यक्तींना वेगळे शुल्क कसे काय आकारले जाते. हा व्यवहार मोठ्या प्रमाणात डिजिटल होत असल्यामुळे ग्राहकांची बरीच माहिती चालकाकडे जाते.
या परिस्थितीमध्ये ग्राहकाच्या माहितीची साठवणूक कशा प्रकारे केली जाते, या संदर्भातही सरकार या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करणार आहे. या आठवड्यात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनीही या कंपन्या विरुध्द आमच्याकडे प्रचंड तक्रारी आल्यामुळे या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले होते.
त्याचबरोबर सध्याच्या ग्राहकांना अधिक भाडे आकारले जाते तर नव्या ग्राहकांना कमी भाड्यावर प्रवास करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे भाडे कुठल्या पद्धतीने आकारले जाते यासंदर्भात आम्हाला या अधिकाऱ्याकडून माहिती करून घ्यायची असे त्यांनी सांगितले.