मुंबई – अमेरिकेची व्याजदरवाढ आणि रशिया- युक्रेन युद्धामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्री करून परत निघून जात आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातील परदेशी गुंतवणूक सध्या कमी होऊन 19.5 टक्क्यावर आली आहे.
बॅंक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज इंडिया या संस्थेने संकलित केलेल्या माहितीनुसार परदेशी गुंतवणूकदारांची राष्ट्रीय शेअर बाजारातील पहिल्या 500 मोठ्या कंपन्यातील गुंतवणूक मार्च महिन्यामध्ये कमी होऊन 19.5 टक्क्यावर आली आहे. परदेशी गुंतवणूकदारांचे भारतीय शेअर बाजारात सध्या साधारणपणे 619 अब्ज डॉलर आहेत.
मार्च 2019 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक कमी होऊन 19.3 टक्क्यावर आली होती. त्यानंतर ती वाढत गेली. मात्र आता पुन्हा ही गुंतवणूक कमी होऊ लागली असल्याचे दिसून येत आहे. मार्च 2021 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक 21.2 टक्के होती.
एकीकडे परदेशी गुंतवणूक कमी होत असतानाच निर्माण झालेली पोकळी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांकडून भरून काढली जात आहे. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यामध्ये आठ अब्ज डॉलरच्या शेअरची खरेदी केली. त्याचबरोबर सरलेल्या पूर्ण वर्षात देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 14.6 अब्ज डॉलरच्या शेअरची खरेदी केली आहे.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारांमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक ऊर्जा क्षेत्रात असून त्यानंतर माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रात परदेशी संस्थागत गुंतवणूकदार अधिक सक्रिय आहेत. मार्च महिन्यामध्ये युद्ध आणि अमेरिकेच्या व्याजदर वाढीमुळे बरेच परकीय संस्था गुंतवणूक भारतातून परत गेले. भारताबरोबरच तैवान, कोरिया, फिलिपाईन्स मधूनही अमेरिकेच्या व्याजदर वाढीमुळे परदेशी गुंतवणूक परत जात आहे.