पुणे, दि. 8 – पीएमपीला आठ महिन्यांत चार हजार 273 तक्रारी आल्या असून यातील 60 टक्के पेक्षा अधिक तक्रारीची कोणतीही ठोस कारवाई न करताच त्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पीएमपीने उभारलेली तक्रार निवारण केंद्रावर किती विश्वास ठेवायचा? असा प्रश्न पडतो. तक्रार निवारण केंद्र केवळ नावालाच आहे की काय? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची महत्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून पीएमपीकडे पाहिले जाते. दररोज सुमारे 10 ते 12 लाख प्रवासी पीएमपीने प्रवास करत असतात. प्रवाशांना दररोज प्रवासादरम्यान चांगले-वाईट अनुभव येत असतात. बसथांब्यावर बस थांबवली नाही, थांब्यावर गाडी उशीरा आली, चालक-वाहकांनी प्रवाशांशी गैरवर्तन केले, गाडी अस्वच्छ होती, चालक मोबाइलवर बोलत होता, गाडी वेगाने चालवली या सारख्या विविध अडचणी प्रवासादरम्यान येत असतात. या अडचणी प्रवाशांनी तक्रार निवारण केंद्रावर फोन करून, एसएमएस, ई-मेल किंवा पीएमपीच्या संकेतस्थळावर जाऊन तक्रार नोंदवू शकतात. यासाठी पीएमपीने लोखो रुपये खर्च करून तक्रार निवारण केंद्र उभारले आहे. प्रवाशांनी ऑनलाइन तक्रार नोंदवल्यानंतर प्रवाशांना तुमची तक्रार नोंदवली असल्याचा एसएमएस येतो. त्यानंतर पीएमपी प्रशासनाला कंट्रोल रूममध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी आगार स्तरावच सोडविण्याल्या जातात. मात्र, मागील दीड महिन्यांपासून पीएमपीचे अध्यक्षच रजेवर असल्याने किती तक्रारी सोडवल्या हा प्रश्नच पडतो.
तक्रार निवारण व्यवस्थेचा मुळ उद्देश हा तक्रारी कमी करून सेवची गुणवत्ता वाढवणे हा असला पाहिजे. तक्रारीच्या मूळ कारणाचा शोध घेऊन वारंवार येणाऱ्या तक्रारींवर कायम स्वरूपाचा तोडगा काढला पाहिजे. आजतरी पीएमपी प्रशासन कुठलाही ठोस उपाय न करता तक्रारी बंद करण्यावरच भर देत आहे. – संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच, मानद सचिव
आठ महिन्यांतील तक्रारी…
जानेवारी – 366, फेब्रुवारी – 359, मार्च – 480, एप्रिल – 651, मे – 601, जून – 565, जुलै – 608, ऑगस्ट – 643
इथे करा तक्रारी : फोन क्रमांक – 020-24545454 , ई-मेल आयडी – लोश्रिरळपीींऽिाश्र.ीेस एसएमएस- 9881495589 या क्रमांकावर करावा.