सातारा -जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना 24 वर्षानंतर मंजूर करावयाचे निवडश्रेणी प्रस्ताव नस्ती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून गहाळ झाली. ही नस्ती कार्यालयास सादर न करता ती गहाळ केल्याचा ठपका ठेवून तत्कालिन वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पी. एस. पाटणकर यांच्याविरोधात जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, दि. 22 ऑगस्ट 2016 च्या आदेशान्वये जिल्ह्यातील 966 प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना निवडश्रेणी मंजूर झाली होती. शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पी. एस. पाटणकर यांच्या ताब्यात निवडश्रेणीची मूळ नस्ती होती.
कार्यालयाने त्यांना नेमून दिलेल्या कामकाजामध्ये त्यांच्याकडे असणारे शासकीय कागदपत्रे जतन करण्याची जबाबदारी दिली आहे.
पाटणकर यांच्याकडे या नस्तीबाबत वेळोवेळी मागणी करुनही त्यांनी ती नस्ती जमा केली नाही. ही नस्ती जमा केल्याचे ते सांगत असले तरी प्रत्यक्षात ती प्रशासनाकडे जमा झाली नाही. यादरम्यान पाटणकर यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. यावेळी कागदपत्रे हस्तांतरण करताना निवडश्रेणीची मूळ नस्ती त्यांनी सादर केलेली नाही. त्यामुळे शिक्षकांच्या निवडश्रेणीचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.
पाटणकर यांनी त्यांच्या ताब्यात असलेली निवडश्रेणीची मूळ नस्ती सादर न केल्यामुळे 966 शिक्षकांना आर्थिक लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. दि. 30 जून 2020 रोजी कार्यभार हस्तांतरणावेळी पाटणकर यांनी या नस्तीचे दप्तर सादर केले नाही. त्यामुळे भविष्यात काही कायदेशीर बाब निर्माण झाली अथवा दप्तराचा दुरोपयोग झाला तर जिल्हा परिषदेला हानी होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर यांच्या आदेशानुसार शिक्षण विभागातील अधीक्षक हणमंत यादव यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडील निवडश्रेणी नस्ती, सरकारी दस्तऐवज गहाळ केल्याचा पाटणकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.