पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे हत्येचा कट रचला जात असल्याची तसेच महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्याचे कारस्थान केले जात असल्याची तक्रार कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे. विशिष्ट पोर्टलवर कमेंट करणाऱ्यांविरोधात सदर तक्रार करण्यात आली आहे.
खाबिया यांनी दिलेल्या तक्रारीत सांगण्यात आले आहे, की विधानसभा निवडणुकीचे राजकारण थांबल्यावर असे प्रकार कमी होतील असे वाटल्याने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर काही लोक जे सातत्याने यू-टयूबवर पोस्टमन, थिंकटॅंक या चॅनेलद्वारे अपलोड केलेल्या व्हिडिओवरील भाषणे पाहिली, तर तरुणांमध्ये आणि समाजात शरद पवार यांना संपवले पाहिजे, बॉम्ब व गोळ्यांचा वापर केला पाहिजे, अशी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे.
कोरेगाव-भीमा दंगलीचे खरे सूत्रधार कोण? यावर अजून प्रश्नचिन्ह असताना ही वक्तव्ये ज्या भाषणातून येतात त्या केवळ प्रतिक्रिया नसून मोठ्या नेत्यांच्या योजनावर हत्येचा कट आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच याप्रकरणाची गांभीर्य व तातडीने लक्षात घेता सर्व पातळ्यांवर त्वरीत सखोल तपास करुन या कारस्थानाच्या सूत्रधारांवर कठोर कलमांद्वारे गुन्हे दाखल व्हावेत,’ अशी मागणी करण्यात आली आहे.