रेडा (प्रतिनिधी) – शनिवारी (दि. 18) झालेल्या अवकाळी व गारपिटीने फळबागा व शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त फळबागा व शेतीपिकांचे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी इंदापूर तालुका भाजपच्या वतीने तहसीलदारांकडे सोमवारी (दि. 20) करण्यात आली आहे.
अचानकपणे वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने नुकसानाची तीव्रता वाढली आहे. तालुक्यातील डाळिंब, द्राक्ष, केळी, गहू, हरभरा, मका, ऊस तसेच कडवळ, मकवान या चारा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हेही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून शासकीय पातळीवर प्रयत्न करीत आहेत.
तरी इंदापूर तालुक्यात वादळी पावसाने नुकसान झालेल्या फळबागा व पिकांचे आपले कार्यालयामार्फत पचंनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भाजपचे इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद व कार्यकर्ते उपस्थित होते.