नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील शब्द युध्द विकोपाला गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग दल आणि बजरंग बली यांच्या अनुशंगाने जे विधान केले होते त्यावर आता कॉंग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे.
पंतप्रधान बजरंग बली यांची बजरंग दलाशी तुलना करून आमच्या श्रध्देचा अवमान करत आहेत अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केली आहे. तसेच या विषयावर पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणीही खेरा यांनी केली आहे.
बजरंग बलींचा फोटो दाखवत खेरा म्हणाले की तुम्ही आमच्या आराध्य देवतेचा अपमान करत आहात. त्यांची तुलना करत आहात. ते (बजरंग बली) सगळ्यांचे रक्षण करतात. मोदीजी ते तुमचेही रक्षण करतात. असे असूनही तुम्ही त्यांची बजरंग दलाशी तुलना करत आहात.
तुमच्या स्वत:च्या पक्षाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे 2017 मध्ये म्हणाले होते की हे आयएसआयचे लोक आहेत. ते आयएसआय सर्टिफाइड आहेत. मोदीजी तुम्ही तुम्ही स्वत:च फोन करून ज्योतिरादित्य शिंदे यांना विचारा की त्यांचे बजरंग दलाबाबत काय विचार आहेत.
तुम्ही अशी चुकीची तुलना करणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही. तुम्ही बजरंग बलीचा अवमान करू शकत नाही. ते आमच्या श्रध्देचा, आस्थेचा विषय आहेत. आमची श्रध्दा आम्ही आमच्यापुरती मर्यादीत ठेवतो. मात्र प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. या देशातील कोट्यवधी लोक बजरंग बलींना आपल्या हृदयाजवळ ठेवतात त्या सगळ्या लोकांची मोदी यांनी माफी मागावी.