अधिकारी गेले निघून; आमदार, नगरसेवकांनीच दिली माहिती
येरवडा – फुलेनगर प्रभाग क्रमांक 2 मधील रखडलेल्या कामासाठी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता; परंतु क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त हा दौरा अर्धवट सोडून निघून गेले. त्यामुळे संबंधित प्रश्नांची माहिती कोणाकडून घ्यायची? कोणाला सूचना करायच्या, असा प्रश्न आयुक्तांना पडला.
अतिक्रमण केलेल्यांना नोटीस दिली का? असे आरोग्य निरीक्षकांना विचारण्यात आले. त्यांना याबाबत काही सांगता आले नाही. त्योळी, ते नवीन आहेत त्यांना माहिती नाही, असे लोकप्रतिनिधींनीच आयुक्तांना सांगितल्यानंतर आरोग्य निरीक्षकांची सुटका झाली. आयुक्तांचा हा दौरा पूर्ण झाला खरा; परंतु काही प्रश्नांची उत्तरे मात्र अर्धवटच राहिली.
आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपूल, वाय आकाराचा ग्रेडसेपरेटर, रत्यावरील अतिक्रमणे काही विकासकामांत अडथळा ठरत आहेत. याकरिता महापालिका आयुक्तांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी आमदार सुनील टिंगरे, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका शीतल सावंत, माजी नगरसेवक आयुब शेख, पथविभागाचे प्रमुख व्ही. जे. कुलकर्णी, श्रीनिवास बोनाला, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय लांडगे आदी उपस्थित होते.
आळंदी रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने पालखी मार्गावरील विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपूल तसेच ग्रेडसेपरेटरचे काम लवकर सुरू करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. मात्र, चौकातील उड्डाणपूल तसेच ग्रेडसेपरेटरचे कामास सुरुवात केल्यास ओव्हरब्रीजच काय नियोजन करणार आहात? असा प्रश्न आयुक्तांनी केला. ओव्हरब्रीज केव्हा बांधला आणि त्यासाठी किती खर्च केला याची माहितीही मागितली; परंतु माहिती देण्यास अधिकारी नसल्याने उड्डाणपुलांसाठी नेमलेल्या सल्लागाराची बैठक गुरुवारी घेत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींच्या मागण्या…
लोहगाव ते शांतीनगर नाल्याचे काम जायका प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात करावे, 83 झोपडीधारकांना आहे त्या जागेवरच बीएसयूपीअंतर्गत घरे बांधून देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी केली. तर, अग्रसेन शाळा ते कॉमर्स झोन आयटी पार्क डीपी रस्त्याचे काम जागा हस्तांतरित नसल्याने रखल्याने आयुक्तांनी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी केली. माजी सैनिकनगर रस्ता, प्रतिकनगर जेसीडी पार्क सोसायटी रस्ता करावा. 20 घरांचे अतिक्रमण काढून त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी नगरसेविका शीतल सावंत आणि माजी नगरसेवक आयुब शेख यांनी केली.