आळंदी -तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे सुसज्ज अशा ग्रामीण रुग्णालयाची उभारणी दोन-तीन वर्षांपूर्वी करण्यात आली. मात्र, सोयीसुविधांची आजही वानवा कायम आहे. त्यामुळे आळंदी शहर कॉंग्रेसच्या वतीने संबंधितांना या रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
खेड तालुक्यात आळंदी, चाकण राजगुरुनगर ही प्रमुख शहरे आहेत. आळंदीच्या तीर्थक्षेत्र परिसरात सुमारे 40 ते 50 गावांचा संपर्क आहे. या गावांतून रुग्ण आळंदीत येत असतात. मात्र, येथे रुग्णांना कुठली सुविधा योग्यरीत्या मिळत नसल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अथवा रुग्णांना भरती करून घेण्यासाठी कोणतीही सोय नाही. रात्री-अपरात्री गर्भवती महिला प्रसुतीसाठी आल्या तर त्यांना इतर रुग्णालयाचा रस्ता विविध कारणे सांगून दाखविला जातो.
सध्या आळंदी व परिसरात करोनाचा प्रदुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढला असून, ग्रामीण रुग्णालय भाविकांसाठी व परिसरातील गोरगरीब जनतेसाठी माफक दरात सर्व यंत्रांनी सुसज्ज असणे गरजेचे आहे. मात्र, येथे कोणत्याही सुविधा नसल्याने रुग्णांना नाईलाजाने पुणे,पिंपरी-चिंचवड, भोसरी आदी ठिकाणी उपचारासाठी रात्री-अपरात्री धाव घ्यावी लागते.
आळंदी देवाची येथील एमआयटी कॉलेजची जागा सुमारे 180 खाटा आरक्षित केली असली तरी या ठिकाणीदेखील कोणतीही सुविधा मिळत नाही. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष घालून आळंदी ग्रामीण रुग्णालय व एमआयटी कॉलेजचे कॉल सेंटर त्वरित सुरू करावे व रुग्णांना दिलासा द्यावा, असेही निवेदनात नमूद केले आहे.