कर्जत – तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्यापासून टाळण्यासाठी आणि ओलिताखालील येणाऱ्या पीक क्षेत्रासाठी व पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर कालवा सल्लागार समितीची बैठक बोलावावी अथवा आपल्या अधिकारात पुढच्या काही दिवसात उन्हाळी आवर्तन सुरू करण्याबाबतचे आदेश द्यावेत, अशी विनंती कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आ. रोहित पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आपल्या मतदारसंघातून जाणाऱ्या कुकडी डावा कालव्यावर एकूण 54 गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. या भागातील शेतकऱ्यांना सोडण्यात आलेले मागील हंगामातील आवर्तन मार्च 2023मध्ये संपून जवळजवळ एक ते दीड महिना उलटला आहे आणि सध्या उन्हाची तीव्रतादेखील वाढत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वरचेवर खालावत आहे. दरम्यान, चारा पिके, फळबागा, उन्हाळी पिके आदी पिकांसाठी पाण्याची टंचाई भासत आहे. यासाठीच आ. पवार यांनी मंत्री पाटील यांची भेट घेऊन उन्हाळी आवर्तन सुरू करण्यासंदर्भात विनंती केली आहे.
मागच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कुकडीचे तीन आवर्तन द्यावे लागतील. याबाबतचा विषय आ. पवार यांनी मांडून त्यापैकी उन्हाळी आवर्तन कुठल्याही परिस्थितीत योग्य वेळेत द्यावे लागेल, असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर दोन आवर्तनानंतर उन्हाळीच्या बाबतीत आपण चर्चा करू, असे पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्याच अनुषंगाने आता परत एकदा मागणी करून आता हीच पाणी सोडण्याची योग्य वेळ आहे. त्यामुळे आवर्तनाचे पाणी सोडून सहकार्य करावे.