पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने केशवनगर, चिंचवडमध्ये नदी किनारी 18 मीटर रस्त्याचे काम करण्यात येत आहे. मात्र जमीन मालकाने 50 मीटरची रस्त्याची जमीन ताब्यात देण्यास नकार दिल्याने हे काम अर्धवट स्थितीत आहे. रस्त्याच्या कामासाठी महापालिकेने येथे मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. दोन्ही बाजूने सीमा भिंत उभारली आहे. त्यामुळे या खड्ड्यामध्ये पुराचे पाणी जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आसपासच्या चार सोसायट्यांना पुराचा फटका बसू शकतो.
पिंपरी चिंचवड लिंक रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत आहे. हा ताण दूर करण्यासाठी विकास आराखड्यातील नदी किनारी असलेला 18 मीटर रस्ता विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. चिंचवड काळेवाडी पवना नदी पुलापासून सुरू होणारा हा रस्ता पिंपरी चिंचवड लिंक रस्त्यावरील संत मदर तेरेसा उड्डाणपूल (एम्पायर इस्टेट उड्डाणपूल) येथे येऊन मिळतो. या रस्त्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र माणिक कॉलनीच्या पुढे केशवनगर कडे येणाऱ्या या रस्त्यावर 50 मीटर रस्त्याचे काम बाकी आहे.
नदी किनारी असलेल्या या रस्त्याला धोका उत्पन्न होऊ नये म्हणून महापालिकेने दगडाची सीमा भिंत उभारली आहे. केवळ मधल्या 50 मीटर रस्त्यावर सीमा भिंत उभारलेली नाही. कारण येथील जमीन मालकाने आधी मोबदला द्या, मगच काम करून देईल अशी भूमिका घेतली आहे.
महापालिकेने येथील 50 मीटर भागात सीमा भिंत उभारण्यासाठी खड्डा खोदला आहे. मात्र त्यानंतर जमीन मालकाने हरकत घेतल्याने येथील काम बंद पडले. त्यामुळे हा खड्डा तसाच कायम राहिला आहे. पावसाळा अगदी एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. अशातच येथील खड्डा न बुजवल्यास या खड्ड्याच्या माध्यमातून पुराचे पाणी सोसायटीच्या सीमा भिंतीला धडक देऊ शकते. पुराच्या पाण्यामुळे सीमा भिंत खचल्यास येथील सोसायट्यांनाही पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
पावसाळ्यापूर्वी येथील खड्डा बुजवावा अशी मागणी मी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जर रस्त्याच्या अर्धवट कामामुळे स्थानिक नागरिकांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेवर राहील.
– राजेंद्र गावडे, माजी स्थानिक नगरसेवक
पाटबंधारे विभागाकडूनही पुराचा इशारा
पवना नदी किनार चिंचवडगाव परिसरात महापालिकेने नदीपात्रात सीमा भिंत उभारल्याचे पाटबंधारे विभागाने महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. या सीमा भिंतीमुळे पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे ही सीमा भिंत काढून टाकण्यात यावी असेही पाटबंधारे विभागाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र नदी सुधार प्रकल्प अंतर्गत नदी किनारी सीमा भिंत बांधण्याबाबत महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव सध्या पाटबंधारे विभागाकडून मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.