मुंबई – पंतप्रधान मोदींनी गेल्या १३ महिन्यात महाराष्ट्राला किमान आठ ते दहा वेळा भेटी दिल्या आहेत. याचा अर्थ त्यांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे असे नाही. महाराष्ट्रात लोकसभेच्या अधिक जागा आहेत म्हणून ते सारखे इकडे येतात परंतु त्यांनी एकदा मणिपुरलाही जावे अशी सुचना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राची भूमिका महत्वाची आहे याच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १३ महिन्यांत महाराष्ट्राच्या अनेक भेटींचा संबंध जोडून राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राऊत म्हणाले की मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे त्यांचं महाराष्ट्रावर तितकं प्रेम आहे असं नाही किंवा ते उत्तर प्रदेशला जात आहेत म्हणून ते उत्तर प्रदेशवर प्रेम करतात असं नाही.
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जागा जास्त आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्रात जागा आहेत असे राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले. हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट न दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली. पंतप्रधानांनी महाराष्ट्राला कितीही भेटी दिल्या तरी ते भाजपला मते मिळवून देऊ शकत नाहीत कारण येथील त्यांचे सरकार अपयशी आहे असेही त्यांनी नमूद केले.