नवी दिल्ली : देशात करोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला आहे. तसेच करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात २७ हजार ७१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर, ३० हजार ६९५ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. याशिवाय, ३३६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद देखील झाली आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ९८ लाख ८४ हजार १०० वर पोहचली आहे.
सद्यस्थितीस देशात ३ लाख ५२ हजार ५८६ अॅक्टिव्ह केसेस असून, ९३ लाख ८८ हजार १५९ जण करोनामुक्त झालेले आहेत. याशिवाय आतापर्यंत देशभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ४३ हजार ३५५ वर पोहचली आहे. देशभरात करोनाच्या पार्श्वभूमीवर १३ डिसेंबरपर्यंत १५, ४५, ६६, ९९० नमुने तपासण्यात आले. यापैकी ८ लाख ५५ हजार १५७ नमुने काल तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
दरम्यान, देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यासारखा वाटत असला तरी तो संपलेला नाही. करोना परत येईल का, याची भीतीही आहेच. त्यामुळे लस हा सध्या एकमेव उपाय असून, यासाठी अनेक राष्ट्रांत चढाओढ आणि प्रयत्न चालू आहेत. लसनिर्मितीत भारत इतर देशांइतकाच सक्षम असल्याचे प्रतिपादन वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी केले आहे.
तसचे, ऑक्सफर्ड विद्यापीठ-अॅस्ट्राझेनेका यांची लस विकसित करत असलेल्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियातर्फे कोविड-१९ लसीकरणाची मोहीम भारतात जानेवारीपर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याचे या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. या लसीच्या आणीबाणीकालीन वापरासाठी चालू महिना अखेपर्यंत आपल्याला परवानगी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.