काऱ्हाटी – काऱ्हाटी (ता. बारामती) येथील अरविंद रघुनाथ वाबळे यांची मुलगी प्रियांका व दादा त्र्यंबक सुपेकर यांचा मुलगा प्रवीण (रा. कुळधरण, ता. कर्जत) यांचा विवाह पाहण्यासाठी आलेल्या कार्यक्रमातच पार पडला.
दुपारी मुलगी पाहण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. पाच वर्षापासून पाऊस पाणी नाही. यंदाचं हे दुष्काळाचं वर्ष. कार्यक्रमास उपस्थित पाहुण्यांच्या मनात विचार आला की पाच वर्षापासून कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही तर लग्नात होणारा अनाठायी खर्च, मांडव, घोडा, वाजंत्री व इतर मानपान यासाठी होणारा खर्च कमी झाला तर दोन्ही परिवार यांच्या फायद्याचे होईल. हा विचार प्रत्यक्ष मांडण्यात आला. या दोन्ही बाजूंच्या मंडळींनी मान्यता दिली व तीन तासांत लग्नविधी उरकला.
सर्वांनी दाखवलेल्या विश्वासामुळे दोन्ही परिवाराचा होणारा अनाठायी खर्च टाळल्याने आणि परिसरामध्ये याची चर्चा चांगलीच रंगली. सर्वांनी अशाच साध्या पद्धतीने लग्न केल्यास होणारा खर्च, ध्वनि प्रदूषणास आळा बसेल व विचारांची एक नवीन देवाण-घेवाण वाढण्यास मदत होईल, असे मत उपस्थित ग्रामस्थांनी मांडले. याप्रसंगी शेकडो नागरिक उपस्थित होते.