तांबेंचे कॉंग्रेससह मामाच्या विरोधात बंड
तांबेंना पाठिंबा देऊन निवडणूक बिनविरोधचा प्रयत्न
नगर – विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कॉंग्रेसला कात्रजचा घाट दाखवित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर जिल्ह्यात माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांची कोंडी करीत विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. कॉंग्रेसचे अधिकृत उमदेवार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता त्यांच्याऐवजी चिरंजीव सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ऐनवेळी कॉंग्रेसला उमेदवार राहिला नाही, तर भाजपने उमेदवार न देता सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. या निमित्ताने तांबे यांनी कॉंग्रेससह मामा आ. थोरात यांच्या विरोधात बंड केल्याचे दिसून येत आहे.
अर्थात सत्यजित तांबे यांनी आपण सर्वपक्षीय उमेदवार असल्याचे सांगून भाजपकडे पाठिंब्याची मागणी करणार असल्याचे स्पष्ट करताना मी कॉंग्रेसचा उमेदवार असल्याचे सांगितले. कॉंग्रेसने मात्र त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यामुळे ते साहजिकच भाजपचे पुरस्कृत उमेदवार होतील. भाजपने पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली असून, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू झाला आहे.
परिणामी सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये भाजपला मोठा नेता मिळेल आणि आ. थोरात यांची कोंडी करता येईल, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्याबरोबर जिल्ह्यात भाजपअंतर्गत वाढत चाललेल्या मंत्री विखे यांच्या वर्चस्वालादेखील तांबे यांच्या माध्यमातून शह देण्याची खेळी यानिमित्ताने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खेळली आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसची मोठी नामुष्की झाली आहे. पक्षाकडे उमेदवार असताना, तसेच तो निवडून येण्याची पूर्णपणे शक्यता असतानाही अखेरच्या क्षणी डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेऊन चिरंजीव सत्यजित यांना निवडणूक रिंगणात उभे केले. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघावर सलग तीन निवडणुकीत कॉंग्रेसने वर्चस्व मिळविले होते. ते आता धुळीस मिळाले असून, पुन्हा भाजपने हा मतदारसंघ या ना त्या मार्गाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपकडून मात्र शेवटपर्यंत अधिकृतपणे उमेदवारीची घोषणा करण्यात येत नव्हती. शेवटी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. आता ते आपण कॉंग्रेसचे असल्याचे सांगत असले, तरी भाजपकडूनही त्यांच्यावर दावा केला जाऊ शकतो. कदाचित त्यांना बिनविरोधही निवडून आणले जाऊ शकते. यात कॉंग्रेसची मोठी नामुष्की झाली आहे. पक्षाने डॉ. तांबे आणि आ. थोरात यांच्यावरही मोठा विश्वास टाकून पर्यायी व्यवस्था केली नव्हती. मुळात या मतदारसंघात डॉ. तांबे यांनी आधीपासूनच नेटवर्क उभारलेले आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने निवडणुकीचे गणित सोपे आहे. पक्षाने विशेष काळजी घेत यावर पर्याय तयार ठेवायला हवा होता.
उमेदवारी निश्चित झाल्यानंतरही डॉ. तांबे उमेदवारी दाखल करीत नव्हते, ही गोष्टही पक्षाकडून गांभीर्याने घेतली गेली नाही. आ. थोरात यांच्याच प्रतिमेचे पक्षीय पातळीवर नुकसान होणार आहे. केंद्रातही वजन असलेल्या आ. थोरात यांना पक्षातील आणि त्यांच्याच मतदारसंघातील आणि तेही नातेवाईक असलेल्या कार्यकर्त्यांनी धक्का दिला आहे. प्रदेशातील नेत्यांनी याकडे सुरवातीपासूनच फारसे गांभीर्याने पाहिले नसल्याचेही दिसून येते. त्यामुळे वेळ पडली तर याला सर्वस्वी थोरात यांनाच जबाबदार धरण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो.