कोपरगाव – गावाच्या कल्याणासाठी सरपंचाने प्रामाणिक काम केले पाहिजे. नियमाप्रमाणे काम करा न होणारे कामे होतात. देव कुठे नसतो, तर देव गावकऱ्यांच्या सेवेतच असतो. समाजासाठी जे जगतात तेच समाजाच्या आठवणीत राहतात, म्हणूनच पंढरपूरच्या पांडुरंगापेक्षा सरपंचाचा दर्जा मोठा आहे.
ज्या गावातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे मुबलक पाणी मिळते, त्या गावातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहते. पाण्यामुळे अनेक समस्या सोडवून गावाचा खऱ्या अर्थाने विकास होतो, असे मत राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सरपंच भास्करराव पेरे यांनी व्यक्त केले. बुधवारी सायंकाळी शहरातील कलश मंगल कार्यालयात भाजपच्या प्रदेश सचिव व माजी आ. स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते यांच्या संकल्पनेतून कोपरगाव मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांना ग्रामपंचायतीच्या विविध योजना व ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीसंदर्भात विशेष मार्गदर्शन व कार्यशाळा, तसेच सेवा संस्था अध्यक्ष, संचालकांचा नागरी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आदर्श सरपंच पेरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी युवा नेते विवेक कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी कोल्हे कारखान्याचे संचालक त्र्यंबकराव सरोदे होते.
या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, दत्तात्रय कोल्हे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, भाजपच्या महिला शहराध्यक्षा शिल्पा रोहमारे, विद्या सोनवणे, वैशाली आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती. मतदारसंघातील 122 नवीन नवनिर्वाचित सदस्य व मागील पंचवार्षिकमध्ये सदस्य सरपंच असलेल्या 257 विजयी व पराभूत सदस्यांचा सन्मान या वेळी करण्यात आला.
पेरे म्हणाले की, वाळवंट असलेल्या आखाती देशात पाच-पाच वर्षे पाऊस पडत नाही. तिथे पाण्याचा पत्ता नसतानाही तब्बल 160व्या मजल्यावर मुबलक पाणी येते. मात्र, आमच्याकडे दरवर्षी धो-धो पाऊस पडून गावाला पूर येतो, तरी त्याच गावांना पिण्यासाठी दररोज स्वच्छ पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे. प्रदूषण करून चांगले पाणी आपणच दूषित करीत आहोत. ग्रामपंचायतीचा खर्च जनतेला समजावून सांगितला पाहिजे. ज्याला अक्कल नाही त्यांच्यासाठी सरकारचा अध्यादेश असतो. तुमच्या गावचा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे.
श्रीकृष्ण व छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच अध्यादेश पाळला नाही. जे करायचे ते धाडसाने केले. पण जे-जे केले ते-ते समाजहितासाठी केले. त्यांची भावना कधीच वाईट नव्हती, म्हणून त्यांना समाजाने उच्चस्थानी ठेवले, असे सांगून पेरे यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
या वेळी विवेक कोल्हे म्हणाले की, कोपरगाव मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास झपाट्याने होण्यासाठी नवी कार्यप्रणाली गावपातळीवर कशी राबता येईल, याचा विचार मनात ठेवून भास्करराव पेरे यांच्याप्रमाणे मतदारसंघातील सरपंच, सदस्यांनी काम करावे. यापुढे तालुक्याचा विकास गतिमान करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करीत आहोत. ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी विक्रमी निधी आणून विकासाला चालना दिली. महिला कुठेही कमी नाही हे कोल्हे यांनी महिला मंडळ ते विधिमंडळ कृतीतून सिद्ध केले आहे असे म्हणत गाव कारभाऱ्यांना विवेक कोल्हे यांनी विकासकामाचे नवे तंत्र आणि मंत्र पेरे यांच्याकडून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या वेळी कोल्हे कारखान्याचे संचालक मनेष गिडे, सतीश आव्हाड, ज्ञानेश्वर परजणे, प्रदीप नवले, निवृत्ती बनकर, अतुल काले, योगेश बागूल, दत्ता काले, दीपक गायकवाड, अरुण येवले, सुनील देवकर, केशव भवर, विक्रम पाचोरे, शिवाजी वक्ते, विलास माळी आदी उपस्थित होते.
गावासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवावा
पंचसूत्री कार्यक्रम राबवून गावांची दशा बदलावी. गाव कायम स्वच्छ ठेवावे, स्वच्छ पाणी द्यावे, शेतशिवारात फळांच्या वृक्षांची लागवड केली पाहिजे, गावातील वृद्धांना ग्रामपंचायतने दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ केला तर देशात भिकारीच दिसणार नाहीत. गावांची प्रगती गतिमान होईल.