सुपा – काही दिवसांपासून बंद झालेला सुपा गावचा पाणीपुरवठा आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यातील सुपा येथील दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या व भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे येथील ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सुपा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा डॅमच्या जुन्या जलवाहिनीतून काही भागात पाणी पुरवठा केला जात होता. परंतु गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी संबंधित विभागाने हे पाणी बंद केले होते.
यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. ही समस्या लक्षात घेऊन भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस सागर मैड, संग्राम उद्योग समूहाचे दत्तात्रय पवार, सचिन गायकवाड, संतोष शितोळे, भालचंद्र घुले यांच्यासह कार्यकर्त्यांनी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी विखे पाटील यांनी तातडीने डॉ. पी अल्बलगन यांच्याशी फोनवरून संपर्क करून तातडीने पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्याची दखल घेऊन औद्योगिक वसाहतीच्या जलवाहिनीला पाणी सोडण्यात आले.