शिर्डी, (प्रतिनिधी) – संपूर्ण देशभरात रामनवमी हा सोहळा साजरा होत असताना साईच्या शिर्डीतही जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात पहाटे कावडीने आणलेल्या गंगाजलाने बाबांच्या मंगलस्नानाने झाली. काकड आरतीने उत्सवाच्या मुख्य दिवसाचा प्रारंभ झाला.
दुपारी बारा वाजता भक्तीमय वातावरणात प्रभू रामचंद्रांची मूर्ती चांदीच्या पाळण्यात ठेऊन विधिवत पूजा आणि मंत्रोच्चरात प्रभू रामचंद्रांचा सोहळा साई संस्थानचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा, जिल्हाधिकारी सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या उपस्थितीत आरती करून पार पडला. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने भाविकांना दर्शन सुलभतेने व्हावे, याकरिता साई समाधी मंदिर रात्रभर खुले होते.
राज्यभरातून शेकडो पालख्या दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये अनेक महिला, वयोवृध्द नागरिक, मुले, मुली, पायी चालत येणारे असे हजारो भाविक साईबाबांच्या नावाने घोषणा देत मंदिर परिसरात दाखल झाले होते. त्यामुळे शिर्डीतील भगवे वादळ आणि साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली होती.
४१ डिग्री सेल्सिअस तापमानाच्या कडक उन्हात हजारो भाविक रस्त्यावरून पायी चालत होते. त्यांच्या सेवेसाठी शिर्डी ग्रामस्थ एकवटले होते. अनेक ठिकाणी पाण्याची, नास्त्याची, जेवणाची व्यवस्था केली होती. आज बाबा आपल्या नगरीत आले अशी श्रद्धा मनी बाळगून शिर्डीतील घराघरांतून प्रत्येकी अकरा दशम्या एकत्र करून भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात आल्या.
साई संस्थानच्या प्रसादालयात एक लाख भाविकांना पुरेल,असा मिष्ठान्नरुपी प्रसाद तयार करण्यात आला होता. साई संस्थान प्रशासन, पोलीस प्रशासन, नगर परिषद प्रशासन यांनी चोख नियोजन केले होते. भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून अँब्युलन्ससह डॉक्टरांच्या अनेक टीमही तैनात होत्या.
दुर्दैवाने पाथरे येथून पायी चालत आलेल्या पालखीमध्ये सावळीविहीर येथे एक मोटरसायकलस्वार भरधाव वेगाने घुसून झालेल्या अपघातात एक महिला साईभक्त ठार झाली तर जखमी झालेल्या भाविकांवर साई संस्थान हॉस्पिटलमध्ये तत्काळ उपचार व्यवस्था करण्यात आली होती.
बुधवारी संध्याकाळी बाबांचा सुवर्णरथाची मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये मुंबई येथील सुप्रसिद्ध वंदन ढोल ताशा पथक, लेझिम पथक अनेक नामांकित बँड पथक, शिर्डीतील क्रांती युवक मंडळाचे ढोल ताशा पथक, अनेक पारंपारीक वाद्यांच्या गजरात शिर्डी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली होती.
हिंदू-मुस्लिम बांधवाकडून संदल मिरवणूक
हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असणाऱ्या साईंच्या शिर्डीत दुपारी शेकडो मुस्लिम बांधव व हिंदू बांधव एकत्र येऊन संदलची मिरवणूक काढून द्वारकामाई मंदिरात बाबांना चंदनाच्या अष्टगंधाचा तिलक लावून पूजा, आरती करून दुवा मागण्यात आली. रूढी परंपरेनुसार द्वारकामाई मंदिरातील नवीन गव्हाच्या पोत्याची पूजा संस्थान पदाधिकाऱ्यांनी केली. आज रामनवमी उस्तावाचा तिसरा दिवस असून दुपारी काल्याचे कीर्तन होऊन दहीहंडी फोडून आरती झाल्यावर कार्यक्रमाची सांगता होणार आहे .