जामखेड (प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या वाढलेल्या कालखंडात कर्जत-जामखेडसाठी आमदार रोहित पवार यांच्याकडून पुन्हा एकदा ‘मदतीचा हात’ पुढे आला आहे. कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांतील तब्बल 15 हजार कुटुंबांना पुरेल एवढा 4 ट्रक कांदा-बटाटा त्यांनी दिला आहे. मतदारसंघातील गोरगरीबांना एक किलो कांदा व एक किलो बटाट्याचे प्रशासनाच्या मदतीने वाटप करण्यात येणार आहे.
मागील आठवड्यातही आमदार पवार यांनी मतदारसंघात सुमारे पाच ट्रक गहू आणि डाळ, असे धान्य पोहोच करून गरीब कुटुंबाची काही दिवसांची भूक भागवली आहे.करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढवल्यामुळे गोरगरीब कुटुंबांना, मोलमजुरांना आ. पवार यांनी मदतीचा हात दिला आहे.संकटकाळात मतदारसंघातील कुणावरही उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये, यासाठी विशेष ‘वॉच’ ठेवणाऱ्या आ. पवारांनी आरोग्याबाबत देखील काळजी घेत मतदारसंघच नव्हे, तर संपुर्ण राज्यभर सॅनिटायझरचे वाटप करून ‘करोनाशी लढुना’ या मोहिमेत योगदान दिले आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांना भाजीपाला मिळणार आहे.
भूमिपुत्रांना मदतीचे केले आवाहन
कर्जत-जामखेडच्या भूमीत जन्म घेतलेल्या. परंतु व्यवसाय, नोकरीनिमित्त बाहेर असणाऱ्या भूमिपुत्रांनी मदतकार्यात आपले योगदान द्यावे. प्रशासनाकडे आपणास जमेल ती मदत सुपूर्द करून मदतकार्य करावे. आता ही वेळ एकमेकांना मदत करून खरा मानवधर्म निभावण्याची आहे, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.