नवी दिल्ली – नवोन्मेशामधल्या कामगिरीसाठी संस्थांची क्रमवारी ठरवणाऱ्या अटल रॅंकिंग ऑफ इन्स्टिट्युशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट 2021 केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जाहीर केले. “
“एआरआयआयए’ 2021 क्रमवारी विविध श्रेणींमध्ये जाहीर करण्यात आली. आयआयटी, एनआयटी यासारख्या केंद्रीय निधी प्राप्त तंत्र संस्था, राज्य विद्यापीठे, राज्य स्वायत्त तंत्र महाविद्यालये, बिगर तंत्र सरकारी आणि खासगी विद्यापीठे आणि संस्था अशा श्रेणीत ही क्रमवारी जाहीर करण्यात आली. यावर्षी सहभागी संस्थांची संख्या दुप्पट होत 1438 झाली, तर पहिल्या क्रमवारीच्या तुलनेत चौपट झाली.
आज जाहीर झालेल्या क्रमवारीत, केंद्रीय विद्यापीठे, राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था (तंत्र) या श्रेणीमध्ये महाराष्ट्रातल्या आयआयटी मुंबईने दुसरे स्थान पटकावले आहे. तर सरकारी महाविद्यालये, सरकारी आणि सरकार अनुदानित तंत्रज्ञान संस्था श्रेणीमध्ये सर्वोच्च पाचमध्ये पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम स्थान पटकावले आहे.
याच श्रेणीत मुंबई येथील वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूटने पाचवे स्थान मिळवले आहे. सरकारी आणि सरकार अनुदानित अभिमत विद्यापीठे (तंत्र) या श्रेणीत महाराष्ट्राच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने सहावा क्रमांक तर याच श्रेणीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आठवे स्थान प्राप्त केले आहे.
विनाअनुदानित, खासगी अभिमत विद्यापीठे (तंत्र) या वर्गवारीत महाराष्ट्राच्या सिम्बॉयसिस इंटरनॅशनलने दहावे स्थान मिळवले आहे. तर खासगी महाविद्यालये, विनाअनुदानित, खौगी संस्था (तंत्र) या श्रेणीत महाराष्ट्राच्या जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने पहिले स्थान मिळवले आहे.
“एआरआयआयए’ क्रमवारी, भारतीय संस्थाना आपल्या विचारांना नवी दिशा देण्यासाठी आणि आपल्या परिसरात उच्च दर्जाचे संशोधन, नवोन्मेश आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देणारे पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी निश्चितच स्फूर्तिदायी, असा विश्वास डॉ. सरकार यांनी यावेळी व्यक्त केला. 2025 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने नवोन्मेशाला प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला. नावीन्यता आणि संशोधन यांचे परिमाणात मोजमाप न करता संस्थांनी त्याच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या प्रयत्नांची तसेच “एआरआयआयए’च्या नियोजन आणि अंमलबजावणी आणि याच्या दोन यशस्वी आवृत्त्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेश विभागाची डॉ. सरकार यांनी प्रशंसा केली.