मुंबई – गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरण बदलले आहे. राज्यात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. राज्यातील अनेक शहरांचा पारा दहा अंशाच्या खाली आला आहे. यावेळी शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण करणारी परिस्थिती आहे. राज्यात थंड वारे वाहत असताना अवकाळी पावसाचे संकट आले आहे. कोकणात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. नाशिक जिल्ह्यात यंदाच्या हिवाळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.
उत्तर भारतातून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे राज्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे. बुधवारी धुळ्यात नीचांकी ४.७, तर निफाड येथे ५ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली आहे. २८ जानेवारीपर्यंत दोन पश्चिमी चक्रवात येत असल्याने १ फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडीचा कडाका राहणार असल्याचे हवामान विभागातून निवृत्त झालेले शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
राज्यातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया शहरामंध्ये आगामी आठवडाभरात किमान तापमान हे १२ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी राहील. तसेच दिवसाही गारठा जाणवणार आहे. यासह भारतीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार पुढील ४ ते ५ दिवसात दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे.
निफाडमध्ये निच्चांकी पारा
नाशिकमधील निफाड तालुक्याचा पारा घसरला आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये निफाडमध्ये ४.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. या हिवाळ्यातील हा तापमानाचा नीच्चांक आहे. थंडीमुळे द्राक्षांना तडे तसेच द्राक्ष फुगवणीवर परिणाम होणार आहे. वाढत्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आले आहे.