नवी दिल्ली :- भारतीय कोस्ट गार्ड म्हणजेच तटरक्षक दलाने फिलिपाईन्सच्या तटरक्षकदलाशी सागरी सुरक्षेबाबत सहकार्य करार केला आहे. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, मंगळवारी कोस्ट गार्ड मुख्यालय, नवी दिल्ली येथे भारतीय तटरक्षक महासंचालक राकेश पाल, आणि फिलीपाईन्स तटरक्षकदलाचे आर्टेमियो एम अबू, कमांडंट, यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
दोन्ही देशांनी सागरी मुद्द्यांवर पहिलीच द्विपक्षीय बैठकही घेतली. सागरी कायदा अंमलबजावणी,सागरी संशोधन मोहीमा आणि बचाव कार्य, सागरी प्रदूषण नियंत्रण या क्षेत्रात दोन तटरक्षक दलांमधील व्यावसायिक संबंध वाढवण्याचा प्रयत्न आज करण्यात आलेल्या करारातून करण्यात आला आहे. त्यातून सागरी क्षेत्रातील वातावरण स्वच्छ राहण्यासही मदत होणार आहे.
फिलिपाईन्सचे पाच सदस्यीय शिष्टमंडळ 20-24 ऑगस्ट या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहे. यापूर्वी, शिष्टमंडळाने 21 ऑगस्ट रोजी गोव्याला भेट दिली होती, जिथे त्यांनी आत्मनिर्भर भारत अंतर्गत भारतीय तटरक्षक जहाजे आणि विमानांच्या ऑपरेशनल क्षमतांची पहाणी केली.