मुंबई – इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर आता भारतीय संघाच्या निवडीसाठी निवड समितीच्या बैठकीत संघाचे मुख्य प्रशिक्षक व कर्णधार यांनाही मत मांडण्याचा अधिकार असावा, असा पर्याय भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुचवला आहे.
संघ हित पाहता प्रशिक्षक व कर्णधार हे सर्वोत्तम संघ घेऊऩच खेळले पाहीजेत तरच कामगिरी देखील सरस होइल, असा दावाही त्यांनी केला आहे.
राष्ट्रीय संघाच्या निवडीसाठी जेव्हा निवड समिती एकत्र येते तेव्हा त्यात केवळ कर्णधाराचीच उपस्थिती असते. त्यातही अनेकदा प्रशिक्षकालाही बोलावले जाते मात्र, त्यांना मत मांडण्याचा अधिकार नसतो त्यांनी केवळ काही खेळाडूंबाबतचे त्यांचे मत सांगायचे असते. हे कोणत्याही खेळातील प्रगतीसाठी योग्य नाही. प्रशिक्षक व कर्णधार प्रत्येक खेळाडूचा सराव व त्याच्या खेळातील भक्कम व कमकुवत बाजू निवड समितीतील सदस्यांपेक्षाही जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतात, त्यामुळे मत असणे आवश्यक आहे, असेही शास्त्री म्हणाले.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये मुख्य प्रशिक्षक निवड समितीचा भाग असतात. निवडसमितीची मते कर्णधाराने जाणून घेणे आवश्यक असते. जर समोरासमोर बसून यावर चर्चा झाली तर कर्णधारही सर्वोत्तम खेळाडूंचीच निवड व्हावी याची काळजी घेईल. येत्या काळात बीसीसीआयने या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करावा, असेही ते म्हणाले.