बावधन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंतची “भिजत घोंगडी’ बाहेर काढून नागरिकांच्या हिताचेच निर्णय घेतले, त्यामुळेच ते जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ठरले आहेत, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा आणि ग्राहकांना ताजी भाजी मिळावी, या उद्देशाने शिवसेना राज्य जनरल कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन दगडे आणि मच्छिंद्र दगडे यांच्या वतीने बावधन परिसरात शेतकरी ते ग्राहक आठवडे बाजार सुरू करण्यात आला, त्याचे उद्घाटन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सत्यवान उभे, पुणे शहर प्रमुख संजय मोरे, उपजिल्हा प्रमुख बबनराव दगडे, अविनाश बलकवडे, पोलीस पाटील बबनराव दगडे, राहुल दुधाळे, राजेंद्र भुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खडकवासला युवा अध्यक्ष कुणाल वेडेपाटील, नगरसेवक किरण दगडे, संगिता पवळे, सरपंच पियुषा दगडे, ग्रामपंचायत सदस्या रंजना दगडे, वैशाली दगडे, कल्पना घुले, रेश्मा दगडे, शीतल दगडे, स्वाती ढमाले, ज्योती चांदीरे उपस्थित होते.
सचिन दगडे म्हणाले की, बावधन बुद्रुक गाव पालिकेत समाविष्ट प्रक्रिया करून, त्याचा आराखडा तयार करण्याआधी गावातील नागरिकांना विश्वासात घ्यावे. त्यासाठी मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक घेऊन येथील प्रश्न सोडवावे, अशी मागणी दगडे यांनी यावेळी केली. विंग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले.