Eknath Shinde Bhavana Gawali – लोकसभेसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी नाराज आहेत. त्यांच्या जागी बुधवारी (दि. 3 एप्रिल) हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आज या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस होता. राजश्री पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी नाराज असलेल्या भावना गवळी यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राजकारणात आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात. कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. भावना गवळी यांनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. आपण महायुतीचा अनादर करणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, काल उमेदवारी नाकारल्यानंतर भावना गवळी प्रचंड नाराज झाल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यावर आता भावना गवळी काय प्रतिक्रिया देतात, ते पाहावे लागणार आहे.
भावना गवळी यांचे सर्व प्रयत्न ठरले फोल –
यवतमाळ-वाशिमची उमेदवारी मिळवण्यासाठी भावना गवळी यांनी खुप प्रयत्न केले. शेवटच्या क्षणापर्यंत त्या मुंबईत ठाण मांडून बसल्या होत्या. त्यांनी नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. मात्र त्या प्रयत्नांचा काहीही फायदा झाला नाही. अखेर त्यांचे तिकीट कापण्यात आले.
भावना गवळी राजश्री पाटील यांना सपोर्ट करणार का?
शिंदे गटाकडून भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांनी काल प्रतिक्रिया दिली होती की, माझी दावेदारी अजूनही कायम आहे. मी आता माझ्या मतदारसंघात जाऊन उमेदवारी अर्ज भरेन, असे त्या म्हणाल्या होत्या. भावना गवळी यवतमाळ-वाशिममधून सलग पाचवेळा निवडून आल्या आहेत. या मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र आता त्यांची उमेदवारी नाकारून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्याने भावना गवळी त्यांना सपोर्ट करणार का? की विरोधात राहून शिंदे यांची डोकेदुखी वाढवणार हे पाहणे महत्वाचे आहे.
राजश्री पाटील यांच्या नामांकन सभेत भावना गवळी गैरहजर –
यवतमाळ-वाशिममधून आज राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. एकनाथ शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते. मात्र भावना गवळी अनुपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांसह संजय राठोड, मदन येरावार, दादा भुसे सह इतर आमदार उपस्थित होते. मात्र, भावना गवळी नामांकनाच्या वेळी देखील गैरहजर होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळमध्ये येऊनही भावना गवळी आपल्या घरीच थांबल्या होत्या. त्यामुळे भावना गवळी यांची नाराजी कायम असल्याचे चित्र आहे.