पुणे – शहर परिसरात गुरुवारी (दि.25) दिवसभर उन्हाचा चटका जाणवत होता. त्यातच दुपारनंतर वातावरणात वेगाने बदल होत, ढगाळ वातावरण निर्माण झाले. मात्र, उकाडा कायम होता.
मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर तयार झालेल्या चक्रावातामुळे वातावरणात वेगाने बदल झाली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मात्र आगामी काळात आकाश निरभ्र राहणार असल्याने पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचेही विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
राज्यात हवामान कोरडे झाल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून, सातत्याने तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे.
या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे थंडीला अडसर निर्माण झाल्याने मागील काही दिवसांपासून किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्याही वर आहे.
दरम्यान नव्याने तयार झालेल्या चक्रावातामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागातील किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली असल्याची नोंद हवामान विभागातर्फे घेण्यात आली आहे.