नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस वाढत असलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर, वस्तू व सेवा कर, ई-बिल या संदर्भात व्यापार संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या वतीने ‘भारत बंद’आज जाहीर करण्यात आला आहे. देशभरातील जवळपास 8 कोटी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जवळपास 40 हजार व्यापारी संघटनांनी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (सीएआयटी) ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला आहे. हा बंद वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या तरतुदींचा आढावा घेण्याच्या मागणीसाठी केला जात आहे. दरम्यान, या बंदमध्ये देशातील काही सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
कोणत्या सेवा बंद राहणार?
– भारत बंदमध्ये देशातील 40 हजारापेक्षा जास्त व्यापारी संघटना सहभागी होणार आहेत. त्यामुळे बहुतांश बाजारपेठा बंद असतील.
– देशातील अनेक भागांमध्ये वाहतूक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. AITWA ने वाहतूक कंपन्यांना सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत आपल्या गाड्या पार्क करण्याचे आवाहन केले आहे.
– बुकिंग आणि बिलासंदर्भातील व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे.
– चार्टर्ड अकाऊंटस आणि टॅक्स अॅडव्होकेट संघटनांनीही भारत बंदचे समर्थन केले आहे. त्यामुळे या सेवांवर परिणाम होणार आहे.
– महिला उद्योगगट, फेरीवाले आणि अन्य लहान व्यापारीही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
– जीएसटीमधील त्रुटींचा विरोध करण्यासाठी कोणताही व्यापारी आज पोर्टलवर लॉग इन करणार नाही.
कोणत्या सेवांवर परिणाम होणार नाही?
– भारत बंददरम्यान अत्यावश्यक सेवा, मेडिकल, दूध आणि भाजी-पाल्यांचा पुरवठा सुरळीत राहणार.
– बँकिंग सेवेवरही या बंदचा कोणता परिणाम होणार नाही.