खडकवासला – सिंहगड परिसरात रविवारी ढगाळ वातावरण तयार होऊन हवेत अचानक गारवा निर्माण झाला होता. या थंडीच्या कडाक्यामुळे नागरिक गारठले होते. त्याचबरोबर खराब हवामानामुळे साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये यावर्षी सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील जनतेने पावसाळ्यात अतिवृष्टी, महापूर अनुभवले. त्यानंतर परतीच्या मान्सूनमुळेही जवळपास संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडला होता. पावसाळा संपून कितीतरी महिने झाले तरी अधूनमधून ढगाळ हवामानाने जनतेचा पिच्छा पुरवला आहे.रविवारी दुपार पर्यंत हे ढगाळ हवामान कायम होते. दुपारनंतर थोडे ऊन पडले तरी हवेतील गारठा कायम होता.
ढगाळ हवामानामुळे साथीचे आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला असून पुन्हा ते रोखण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांत सर्दी, ताप, खोकला यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नोकरी निमित्त बाहेर पडणा-या कामगारांना थंडीचा फटका बसत आहे.