कराडात कमी दाबाने पाणी पुरवठा
गत दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कराड शहरात पाणीपुरवठा करण्यात येणारा जॅकवेल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यावर पर्याय म्हणून काही गृहिणीनी घराच्या गच्चीवर भांड्याला कापड बांधून ठेवले आहे. या भांड्यात साठलेले पावसाचे पाणी उकळून पिण्यासाठी तसेच खर्चासाठी वापरले जात आहे.
कराड – बुधवारी कराड शहरातील काही भागातील पुराचे पाणी कमी झाल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दत्त चौकासह शहरात स्वच्छता मोहीम राबवली. पूराच्या पाण्यामुळे सर्वत्र कचरा व गाळाचे प्रमाण साठले होते. तो सर्व भाग स्वच्छ करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग दोन वर्षे चांगले यश मिळविल्यानंतरही पालिकेने शहरातील स्वच्छतेचे सातत्य कायम ठेवले आहे. गत दोन दिवसांपासून शहरात पूरपरिस्थिती उद्भवल्याने शहरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पालिकेने स्वच्छतेचे व्रत कायमस्वरूपी जागृत ठेवल्याचे दिसत आहे.
पालिकेचे एक पथक पूरग्रस्तांना तात्काळ मदत पोहोचविण्यासाठी तसेच पुरात अडकलेल्या बाहेर काढणे त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी कार्यरत आहे. तर दुसरे पथक शहरात स्वच्छतेसाठी झटत आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी पालिकेकडून घेतली जात आहे, ही बाब कौतुकास्पद आहे.
शहरात पुराचे पाणी दत्त चौकासह, कुंभारवाडा परिसर मुख्य बाजारपेठेत शिरले होते. मात्र बुधवारी पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी या भागातील कमी झाले होते. त्यामुळे या भागात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मात्र शहरात पाटणकॉलनीसह, प्रीतिसंगम परिसरात पूर परिस्थिती कायम असल्याने पूर ओसरल्यानंतर तेथील स्वच्छतेचे मोठे आव्हान पालिकेसमोर असणार आहे. कराड नगरपालिकेत तातडीने आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. पूरग्रस्तांची शहरातील विविध शाळा तसेच इतरत्र ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना चहा, भोजनाची चोख व्यवस्था देण्याबाबत सूचना करण्यात आल्या.