नवी दिल्ली – करोनाचा विषाणू नैसर्गिक आहे की कोणी प्रयोगशाळेत तयार केला आहे याच्या चर्चा अजुनही झडत आहेत. अमेरिकेच्या माजी अध्यक्षांनी त्याला चीनी व्हायरस असे संबोधले होते. तर अमेरिकेच्याच नव्या अध्यक्षांनी या प्रकरणाचा अर्थात शंकेचा सोक्षमोक्ष लावा आणि खरे काय ते जगासमोर आणा असे निर्देश आपल्या गुप्तचर संस्था आणि संशोधकांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर करोनाचा हा विषाणू नैसर्गिकच असल्याचा दावा करणारी माहिती समोर आली आहे.
जगाचे चक्र थांबवणाऱ्या करोना विषाणूचा उगम हा चीनमधील प्रयोगशाळेत असल्याचे कुठलेही वैज्ञानिक पुरावे नसून तज्ज्ञांनी समीक्षण केलेल्या अलिकडच्या शोधनिबंधानुसार या विषाणूचे मूळ हे निसर्गातच आहे, असे वैज्ञानिकांनी लॅन्सेट नियतकालिकातील शोध निबंधात म्हटले आहे. सोमवारी प्रकाशित करण्यात आलेला हा शोधनिबंध जैववैज्ञानिक, परिसंस्थाशास्त्रज्ञ, साथरोगतज्ञ, प्राणिशास्त्रज्ञ, डॉक्टर्स, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ यांचा समावेश असलेल्या चमूने हा शोधनिबंध लिहिला आहे.
नवीन, विश्वासार्ह व वैज्ञानिक माहितीत तपासणी झालेले निष्कर्ष तपासले असून त्यात हा विषाणू नैसर्गिक असल्याचेच स्पष्ट झाले आहे. हा विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडलेला नाही. कारण त्याला कुठलेही वैज्ञानिक पुरावे मिळालेले नाहीत किंबहुना जे पुरावे दिले जात आहेत ते तपासाअंती टिकणारे नाहीत. हा विषाणू प्रयोगशाळेतून सुटला हा केवळ एक दावाच आहे, असे दी लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटले आहेत.
नवीन विषाणू कुठेही तयार होऊ शकतात. त्यामुळे करोनाचा विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून आला याला अजून कुठले पुरावे नसताना तसे म्हणता येणार नाही. बोस्टन विद्यापीठ, मेरीलॅंड विद्यापीठ, ग्लासगो विद्यापीठ, दी वेलकम ट्रस्ट, क्वीन्सलॅंड विद्यापीठ यांचा या संशोधनात सहभाग होता. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकानेही मध्यंतरी चीनच्या वुहान येथे जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी चीनला थेट क्लीन चीट दिली नसली तरी चीनवर कोणताही गंभीर ठपका ठेवला नव्हता. त्यामुळेही बरीच ओरड झाली होती.
आता लॅन्सेटचा दावा खरा मानायचा ठरला तरी करोना विषाणूची ओळख चीनच्याच तज्ज्ञांनाही पटली होती. त्यांनी आपल्या सरकारचे याकडे लक्ष वेधले होते. असे असतानाही चीनने जगाला वेळीच याची माहिती का दिली नाही, जगात अन्य देशांत त्याचा प्रसार होण्याच्या अगोदर त्यांनी आपली आंतरराष्ट्रीय सेवा का स्थगित केली नाही हे महत्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत.