निजामाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या मुद्यावरुन तेलंगणामध्ये तणाव निर्माण झाला आहे. तेलंगणच्या निजामाबाद जिल्ह्यातील बोधन गावात तणावाची स्थिती निर्माण झाल्यामुळे तेथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठीची प्रक्रिया राबवावी लागेल. पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल, असे निजामाबादचे पोलीस आयुक्त के. आर. नागाराजू यांनी म्हटले आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच आणला गेला आहे. त्यामुळे परिसरामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पुतळ्यामुळे अस्वस्थ झालेले काही गट रस्त्यावर उतरून निदर्शने करायला लागले आहेत.
दगडफेकीची किरकोळ घटनाही घडली आहे. अशांततेला अटकाव करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला आणि जमावबंदीचे आदेश लागू करायला लागल्याचेही त्यांनी सांगितले.
काही गटांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीमध्ये एक पोलीस हवालदार जखमी जाला आहे. या संदर्भात पोलिसांनी प्रकरण दाखल करून घेतले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.