मुंबई – काही अपवाद वगळता आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्याने घेत नाही. पण आता तसे करुन चालणार नाही. भाजपाचे पंचायत ते संसद अशी एकहाती सत्ता मिळवताना त्या ठिकाणी दुसरे कोणीही नको या त्यांच्या धारणेला रोखले पाहिजे. आपल्या बुडाखालीच संपूर्ण देश असयलाच हवा हा त्यांचा अट्टाहास ही एका घातक हुकूमशाहीची नांदी आहे. असले हिंदुत्व आपले नव्हते, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. हिंदुत्व हा आपला श्वास आहे राजकारणाचा विषय नाही, असेही त्यांनी ठणकावले.
एमआयएमने दिलेली “ऑफर’ हा शिवसेनेला बदनाम करण्याचा कट
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उध्दव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. एमआयएमने दिलेली “ऑफर’ हा शिवसेनेला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप करून ठाकरे म्हणाले, सत्ता आल्यानंतर निखाऱ्यावरील जमलेल्या राखेवर फुंकर मारण्याची गरज आहे. धगधगता निखारा ही शिवसेनेची ओळख असून ती राख झटकून टाकणं, त्याची धग विरोधकांना दाखवण्याची गरज आहे. एकहाती सत्ता यावर नंतर बोलू पण, पक्ष वाढवण्याची गरज आहे.
आम्ही भाजपाला सोडले, हिंदुत्वाला नाही
आम्ही भाजपाला सोडले, हिंदुत्वाला नाही याचा पुनरुच्चार करत ते म्हणाले, सत्ता असो किंवा नसो आम्ही हिंदुत्वाला सोडणार नाही. विरोधकांचं धोरण ओळखा. भाजपाकडे आपण काय केलं हे सांगण्यासारखं नाही, म्हणून आपल्यावर टीका करत आहेत. उत्तर प्रदेशात त्यांनी दैदीप्यमान विजय मिळवला असं काही नाही. समाजवादी पक्षाच्या जागाही वाढल्या आहेत. एक भ्रम निर्माण केला जात आहे आणि संमोहन करत आहेत.
आता हिंदू खतरे मे अशी नवीन बांग
पूर्वी इस्लाम खतरे मे है म्हणायचे, आता हिंदू खतरे मे अशी नवीन बांग त्यांची सुरु आहे. दरवेळी अनामिक भीती दाखवायची. इतिहासाच्या खपला काढल्या जात असून हा डाव मोडून काढला पाहिजे, शिवसेनेला जनाबसेना म्हटलं जात आहे. आपण हिंदुत्व सोडलेलं नाही. एमआयएने ऑफर द्यायची आणि मग नंतर भाजपाने यावरुन टीकेचा भडीमार सुरु करायचा. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचं. आम्ही भाजपासारखं सत्तेसाठी लाचार नाही. आम्ही एमआयएमसोबत जाणं शक्य नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी मांडवली
अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी मांडवली केली तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणं शक्य नाही. मी तो कदापि येऊ देणार नाही. सत्ता मिळत असली तरी एमआयएमसोबत जाणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तर असत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य ठेवावं लागेल
भाजपात आणि आपल्यात खोटं बोलू शकत नाही हा मुख्य फरक असल्याचं मी सांगितलं. खरं बोलणं हा अवगुण ठरत आहे पण खोटं बोलून जिंकावं लागत असेल तर त्यासारखं दुर्दैव नाही. जर भाजपा अशाच पद्दतीने लढत जिंकत राहिला तर सत्यमेव जयतेच्या जागी असत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य ठेवावं लागेल, अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
आता अश्रू ढाळणाऱ्यांच्यात तेंव्हा हिंमतही नव्हती
काश्मीरमध्ये हिंदू आणि त्याआधी देशाच्या बाजूने असणाऱ्या मुस्लिमांवर अत्याचार झाला. त्यावेळी सरकार भाजपाने समर्थन दिलेल्या व्ही पी सिंग यांचं होतं. त्यांना आपण विरोध केला होता. कारण त्यांनी पंतप्रधान झाल्यावर कोणत्याही मंदिरात नाही तर दिल्लीतील जामा मशिदीत जाऊन शाही इमामला भेटून आले होते. भाजपाने एकही अवाक्षर काढलं नव्हतं. एकच आवाज तेव्हा जो होता तो बाळासाहेब ठाकरेंचा होता. पण आता अश्रू ढाळणाऱ्यांच्यात तेंव्हा हिंमतही नव्हती, असे ते म्हणाले.
दहशतवाद्यांना अंगावर घेणारे बाळासाहेब ठाकरे एकच मर्द होते
सत्य मांडायचं असेल तर सर्वांसमोर येऊ द्या. पण पिढी बदलल्यानंतर आज आम्ही नवीन इतिहास घडवला म्हणून दंड थोपटत आहेत त्यांची नावंही काश्मिरी जनतेला माहिती नव्हती, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. अमरनाथ यात्रा रोखली तर हजसाठी एकही विमान उडू देणार नाही असं कोणीही बोललं नव्हते. दहशतवाद्यांना अंगावर घेणारे बाळासाहेब ठाकरे एकच मर्द होते, दुसरं कोणीही नव्हतें असंही त्यांनी सांगितलं.