नवी दिल्ली – नोएडा आणि ग्रेटर नोएडा विकास प्राधिकरणाने संपादित जमिनीचा वाढीव मोबदला आणि भूखंड मिळावेत या मागणीसाठी शेतकरी संघटना डिसेंबर 2023 पासून आंदोलन करत आहेत. या शेतकरी आंदोलनाने गुरुवारी अधिक तीव्र रुप धारण केले. नोएडा प्राधिकरणाविरोधात संपावर बसलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केले.
यावेळी पोलिसांनी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना रोखल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या आंदोलनामुळे यूपी-दिल्ली हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडा एक्सप्रेस-वे बंद करण्यात आला आहे. नोएडातील शेतकरी 60 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्यासोबत तीन शेतकरी संघटनाही आहेत.
आपल्या मागण्यांबाबत राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनावर दबाव आणण्यासाठी शेतकरी संघटनांनी ७ फेब्रुवारीला किसान महापंचायत बोलावली होती. ८ फेब्रुवारी रोजी संसदेवर निषेध मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या असंतोषाचे कारण म्हणजे त्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही. याशिवाय काही भूमिहीन कुटुंबेही नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.
या आंदोलक शेतकऱ्यांना विविध ठिकाणी रोखण्यात येत आहे. यामुळे शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीत आणि पायी दिल्लीकडे निघालेल्या काही शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. चिल्ला हद्दीपूर्वी प्रेरणा स्थळाजवळ रस्त्यावर वाहने उभी करून शेतकऱ्यांनी अडवल्याचे वृत्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने कलम 144 लागू केले आहे.
पोलिसांच्या समजूतीनंतर नोएडा येथील दलित प्रेरणा स्थळातून शेतकऱ्यांचा गट मागे हटला आहे. पण नोएडा, ग्रेटर नोएडा आणि एनटीपीसी येथे शेतकऱ्यांचे निदर्शन सुरूच आहे. नोएडा-दिल्ली चिल्ला सीमेवर मोठ्या पोलीस बंदोबस्तात बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. सिमेंटचे ब्लॉक्स टाकून शेतकऱ्यांना दिल्लीकडे कूच करण्यापासून रोखता यावे यासाठी सिमेंट ब्लॉक्स ठेवण्यात आले आहेत. नोएडा एक्सप्रेस वे देखील बंद करण्यात आला आहे.