वाढले धूलिकण : प्रमाण 130 मायक्रोग्रॅम प्रतिमीटर क्यूबपर्यंत पोहचले
स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने स्थिती गंभीर
– प्रकाश गायकर
पिंपरी – उद्योगनगरी असूनही पिंपरी-चिंचवड पर्यावरणाच्या दृष्टीने इतर शहरांच्या तुलनेत चांगले मानले जाते. हजारो उद्योग असूनही शहरातील प्रदूषणाची पातळी आटोक्यात असते. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील विकासकामे घातक ठरताना दिसत आहेत. शहरामध्ये दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. शहरात सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट शहरभर पसरु लागले आहेत. 24 तास पाणीपुरवठा योजना, मेट्रो, उड्डाणपूल, खासगी केबलसाठी खोदाई यासारखी कामे सुरू आहेत. मात्र या कामांमुळे शहर धुळीच्या “कवेत’ गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरात हवेतील धुलिकणांचे प्रमाण 130 मायक्रोग्रॅम प्रतिमीटर क्यूबपर्यंत पोहचले आहे. हे प्रमाण 100 मायक्रोग्रॅम प्रतिमीटर क्यूब असणे आवश्यक आहे. वाढलेल्या धुलिकणांचा आरोग्यावर परिणाम होत आहे.
हवेतील धुलिकणांचे दर महिन्यांचे प्रमाण हे 100 मायक्रोग्रॅम प्रतिमीटर क्यूब तर नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण हे 80 मायक्रोग्रॅम प्रतिमीटर क्यूब असणे निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रमाण वाढताना दिसत आहे. पाऊस थांबल्यापासून शहर व उपनगरांमध्ये रस्त्यावर धूळ पसरल्याचे चित्र आहे. भक्ती शक्ती चौक, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपरी या भागामध्ये सकाळपासूनच हवेमध्ये धूलिकण असल्याचे दिसून येते. या भागामध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. तसेच निगडी येथील चौकामध्ये उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. कामासाठी अनेक ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे.
यामुळे सर्वत्र धूळ पसरत आहे. रस्त्यावर पसरलेली धूळ वाहनांमुळे हवेत पसरते. त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्याचप्रमाणे भोसरी एमआयडीसीमध्ये रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणावर रसायनांचा वास येतो. त्यामुळे स्पाईन रस्ता व पिंपरी चौक ते मोशीकडे जाणाऱ्या प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच डोळ्यांची जळजळ होणे, शरिराला खाज येणे अशा तक्रारी नागरिक करत आहेत.
अनेक दिवसांपासून हवा प्रदूषणामध्ये भर पडत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने यांत्रिक पद्धतीने रस्त्यांची साफसफाई सुरू केली आहे. मात्र अनेक उपनगरांमध्ये शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. विशेष करून रुपनीगर, तळवडे, कासारवाडी येथील रस्त्यांची सफाई वेळेत होत नसल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, महापालिका प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात नसल्याने शहरातील स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
या परिसरात धोकादायक स्थिती
पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांची अवस्था जास्त बिकट आहे. एकीकडे खूप मोठ्या प्रमाणात खोदकाम होत असल्याने संपूर्ण परिसरात धूळ, मातीचे साम्राज्य आहे. तर दुसरीकडे महामेट्रोचे सेगमेंट कास्टिंग येथेच तयार होत आहेत. यामुळे भोसरीकडून पिंपळे-गुरवकडे येणाऱ्या पुलावर आणि मार्गावर कायम सिमेंटच्या कणांचे आच्छादन असते. येथे 24 तास सिमेंटचे कण उडत असल्याने नागरिकांच्या डोळ्यांना त्रास होत आहे. तसेच या परिसरात असणाऱ्या हौसिंग सोसायट्यांमधील सदनिकाधारकांना कायम दरवाजे-खिडक्या बंद ठेवाव्या लागतात. लोकांच्या घरांमध्ये सिमेंटचे कण पसरत असल्याने नाका-तोंडावाटे शरीरात प्रवेश करत असल्याने येथील स्थिती अतिशय धोकादायक असल्याचे मानले जात आहे.
कारवाई करण्याची मागणी
शहरामध्ये सुरू असलेल्या विकासकामांना नागरिकांचा विरोध नाही. मात्र ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यास ठेकेदार टाळाटाळ करतात. वर्दळीच्या ठिकाणी काम सुरू असेल तर आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये या परिसरात रात्रीच्या वेळी काम होणे आवश्यक आहे. तसेच अनेक औद्योगिक परिसरातील कारखान्यांमधून रस्त्यावर सांडपाणी सोडले जाते. अशा कारखानदारांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
शहरातील प्रदूषण
रस्ता दुरुस्ती, मेट्रो, 24 तास पाणी
योजना कामांचा फटका
रासायनिक कंपन्या पसरवतायेत दुर्गंधी
ठोस उपायोजना करण्याची मागणी.
हवेतील वाढलेले धूलिकण ठरु शकतात घातक