सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनची भूमिका : टॅंकर चालूच राहिल्यास दावा निरर्थक
पिंपरी – शहरातील नागरिकांना समान पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने महापिालकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अमान्य असल्याची भूमिका पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनने घेतली आहे. नागरिकांच्या दररोजच्या आवश्यकतेपेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होणार असेल तरच या निर्णयात तथ्य आहे, असे फेडरेशनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे आणि प्रवक्ते अरुण देशमुख यांनी याबाबतचे सविस्तर निवेदन महापालिका प्रशासनाला दिले आहे. त्यांनी याबाबतची भूमिका आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केली. त्यांनी म्हटले आहे की, महानगरपालिकेने नागरिकांना विश्वासात न घेता एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जर नागरिकांना खरोखरीच पुरेसा पाणीपुरवठा होणार असेल तर त्याचे स्वागत करायला हरकत नसावी. मात्र, याबाबतच्या महापालिकेच्या कटू पूर्वानुभवांचा विचार करता प्रायोगिक तत्त्वावरील या निर्णयाने फारसे काही साध्य होईल, असे आम्हास वाटत नाही.
या निर्णयामुळे नागरिकांना दररोजच्या आवश्यकतेपेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होणार असेल तरच त्यामध्ये तथ्य आहे, असे म्हणता येईल. कारण हे येणारे पाणी आता दोन दिवस पुरवायचे आहे. ते तसे जर मिळाले तरच हा निर्णय काही अंशी योग्य ठरला, असे म्हणता येईल. सोसायट्यांमध्ये टॅंकरच्या फेऱ्या चालूच राहिल्या. अथवा बोअरवेलच्या पंपाचे विद्युत बिल वाढीव प्रमाणातच येत राहिले तर महापालिकेच्या समन्यायी पाणी पुरवठ्याच्या दाव्यात काहीही तथ्य नाही असेच म्हणावे लागेल.
शहरातील सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याकडे येणारे पाणी किती दाबाने, किती वेळ आणि किती युनिट येते याची माहिती ठेवावी. तसेच एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेण्यापूर्वी लागणाऱ्या टॅंकरची संख्या आणि सध्या लागणाऱ्या टॅंकरची संख्या यांची नोंद ठेवावी. महापालिकेकडे याबाबत सोसायट्यांची भूमिका आकडेवारीसह मांडण्यात येईल. महापालिकेच्या म्हणण्यानुसार जर या निर्णयामुळे पाणीपुरवठ्यात खरोखरीच सकारात्मक बदल होणार असतील तर त्याचे स्वागत करण्यात येईल. फेडरेशनची भूमिका ही केवळ विरोधासाठी विरोध अशी नाही.