पिंपरी – मकरसंक्रांत झाली की वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे शहरातील नागरिक उकाड्याने हैराण होऊ लागले आहेत. जिवाची होणारी काहीली शमविण्यासाठी नागरिकांची पाऊले रसवंतीगृहाकडे वळू लागली आहेत.
मागील आठवड्यापासून शहरातील तापमान वाढले असून फेब्रुवारी महिन्यातच उकाडा जाणवू लागला आहे. दुपारच्या वेळी उन्हामुळे मुख्य रस्त्यांवरील गर्दी कमी होऊ लागली असून, उन्हामुळे रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत रसवंतीगृह सुरू झाले असून उन्हातान्हातून दमलेले नागरिकांची पावले रसवंतीगृहाकडे वळू लागली आहेत. बाजारात इतरही शीतपेयांची दुकाने आहेत, मात्र आयुर्वेदीक दृष्ट्या या रसाचे महत्त्व अधिक असल्याने दिवसेंदिवस रसवंतीगृहाकडे नागरिकांचा विशेष कल दिसून येत आहे.
फिरत्या रसवंतीला विशेष पसंती
पिंपरी, चिंचवड, भोसरी, चिखली तसेच शहरातील विविध भागांत आता फिरती रसवंतीच्या गाड्या दिसत असून, अनेकांना यामुळे रोजगार मिळाला आहे. या चालत्या फिरत्या रसवंतीगृहात ताजा रस मिळत असल्याने नागरिकही आवडीने रसाचा आस्वाद घेत आहेत. रसात लिंबू आणि नारळाचे पाणी टाकून काही विक्रेते हा रस बनवत असल्याने या रसाला अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.