औंध (प्रतिनिधी) : औंध (ता. खटाव) येथे करोनाला रोखण्यासाठी आजपासून ते ३ मेपर्यंत तीन दिवसाचा लाँकडाऊन करण्यात आला आहे. त्याला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे.
औंधमध्ये अत्यावश्यक सेवेत दवाखाने, दूध संकलन केंद्र व स्वस्त धान्य दुकान वगळता संपूर्ण औंध गाव पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत व आपत्कालीन दक्षता समितीने घेतला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी समितीचे सदस्य व स्वयंसेवक व माजी सैनिक खडा पहारा देत आहेत.
नागरिकांनीही पहिल्या दिवसाला चांगला प्रतिसाद दिला असून परिसरातील खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांची कसून तपासणी केली जात आहे व फक्त दवाखान्यासाठी गावात सोडले जाते अन्यथा गावामध्ये प्रवेश बंद केला जात आहे.
अन्य जिल्ह्यातून व मोठ्या शहरातून गावात नव्याने कोणीही येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. कोणी नव्याने गावात आले तर ग्रामस्थांकडून त्यांची माहिती पोलीस विभागाला व आशासेविका, अंगणवाडी सेविकांना देण्यात येत आहे