कोंढवा – महापालिकेकडून वाढीव मिळकतर, मूलभूत सुविधांचा अभाव, तिव्र पाणी टंचाई अशा विविध मुद्यांवर झोपी गेलेल्या पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी आज (गुरुवार, दि.22) उंड्री परिसरातील नागरिकांनी जागरण गोंधळ घालीत महापालिकेच्या नावानं…चांगभले…चांगभले… केले. दुसऱ्या दिवशी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पालिकेमध्ये चर्चेचसाठी बोलाविले आहे. मात्र, उपोषणस्थळीच चर्चा करा, असा पवित्रा उंड्रीगाव संघर्ष समितीने घेतला. उंड्रीतील 125 सोसायट्यांनी उपोषणाला पाठिंबा दिल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.
उंड्रीतील नागरिकांनी पालिकेच्या जाचक अटींच्या निषेधार्थ हनुमान मंदिर चौकात आज गुरुवारी (दि. 22) तिसऱ्या दिवशी उपोषण सुरू ठेवले. प्रशासनाला सुबुद्धी देण्यासाठी यळकोट यळकोट जय मल्हार, करीत जागरण गोंधळ घालण्यात आला. जागरण-गोंधळाकडे बाह्यवळण मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचेही लक्ष वेधले गेले. मात्र, पालिका प्रशासनाला का जाग येत नाही, अशी विचारणा उपोषणकर्त्यांनी केली. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या दराने करआकारणी करावी. करआकारणीतून किमान, पाणी, रस्ते, वीज, आरोग्याच्या सुविधा द्याव्यात, अशी मागणी उपोषणकर्त्या नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे लावून धरली आहे.
अधिवेशनात गाजले उपोषण
हिवाळी अधिवेशनामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी उंड्री ग्रामस्थांच्या करवाढी निषेधार्थ उपोषणाचा मुद्दा उपस्थित केला. तुपे म्हणाले की, शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात घर बांधले आहे, त्याला पालिका प्रशासनाने अवाजवी कर आकारला तो कमी करण्यासाठी त्यांना उपोषण करण्याची वेळ आली आहे, ही बाब दुर्दैवी आहे.