जामखेड – तालुक्यातील एकूण 3 हजार 100 शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत स्थानिक आपत्ती पूर्वसूचना प्रमाणे 1 कोटी 5 लाख 90 हजार 595 रुपयांची भरपाई मिळाली आहे. विमा कंपनी आणि कृषि विभागाकडून खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक आपत्तीनुसार नुकसान भरपाई प्राप्त झाली असून, काढणी पश्चात पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई रक्कम अद्याप कंपनी स्तरावर प्रलंबित आहे. याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
खरीप हंगाम 2022-23 मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता. यामध्ये सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद, कांदा, मुग पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. खरीप हंगामाची सुरुवात झाली असतानाच नैसर्गिक आपत्तीमुळे या सर्व पिकांना मोठा धोका पोहोचला होता. पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते.
तालुक्यातील 3 हजार 100 शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. आपत्तीनुसार झालेल्या नुकसानीच्या प्राप्त झालेल्या वैयक्तिक पुर्वसूचनांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना 1 कोटी 5 लाख 90 हजार 595 रुपयांची भरपाई जाहीर होऊन शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग झाल्याचे खा.डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.