– सोनम परब
अनेक चित्रपट सुरू होण्यापूर्वीच डबाबंद होतात. बॉलीवूडमधल्या उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या प्रेक्षकाला या डबाबंद चित्रपटांचे नंतर स्मरणही राहात नाही.
बॉलीवूडमध्ये एखादा चित्रपट निर्मितीच्याही आधीपासून गाजविण्याचा प्रघात आहे. अलीकडे तर बहुतांश निर्माते “प्रमोशन’साठी प्रचंड मोठे बजेट ठेवतात. एखाद्या चित्रपटासंदर्भात बड्या स्टार्सबरोबर करार झाला, गाण्याचे रेकॉर्डिंग झाले, शूटिंग सुरू झाले, पहिला टीजर किंवा प्रोमो बाहेर पडला,
अशा बातम्या आपल्याला ऐकायला-वाचायला मिळतात आणि नंतर मोठ्या धूमधडाक्यात त्या चित्रपटाचा प्रीमिअर होतो. थिएटर्स आणि मल्टिप्लेक्समध्ये तो झळकतो. मग त्याच्या पहिल्या दिवसाची कमाई, पहिल्या आठवड्याची कमाई अशा बातम्या रंगतात. त्यातून चित्रपटाचे आणखी प्रमोशन होते.
परंतु याच झगमगाटी बॉलीवूडला एक दुखरी बाजूही आहे. काही चित्रपटांची घोषणा होते किंवा ते तयार करण्याचा निर्णय होतो; परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हे चित्रपट तडीस जाऊ शकत नाहीत. एखाद्या बिग बजेट चित्रपटाची गाजावाजा करून घोषणा करण्यात येते आणि प्रत्यक्षात तो चित्रपट कायमचा थंड्या बस्त्यात जाऊन बसतो. असे चित्रपटही कधीतरी चर्चेचा विषय ठरतात.
विकी कौशल आणि सारा अली खान यांचा “अश्वत्थामा’ हा चित्रपट असाच “डबाबंद’ झाल्याची चर्चा आहे. आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होऊ घातलेला हा एक शास्त्रीय चित्रपट होता आणि महाभारतातील एका व्यक्तिरेखेवर आधारित होता. चित्रपटाची घोषणा होताच त्याची खूप चर्चा झाली. चित्रपटाचे पोस्टरही रिलीज करण्यात आले. परंतु आता अशी बातमी आली आहे की, चित्रपट अज्ञात कारणांनी थंड्या बस्त्यात ठेवण्यात आला आहे.
चित्रपट बंद पडण्याचे एक मोठे कारण त्याचे अवाढव्य बजेट हेच असावे, असे मानले जाते. हे बजेट 300 कोटी होते असे सांगितले जाते. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण परदेशांत होणार होते. परंतु टीमला अजून व्हिसा मिळू शकलेला नाही. अशा स्थितीत हा चित्रपट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.
हा चित्रपट बंद केल्यामुळे निर्मात्यांचे 30 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. चित्रपटाची प्रारंभिक तयारी जवळजवळ पूर्ण झाली होती आणि विकी कौशल “मिस्टर लेले’नंतर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार होता. सारा अली खान सप्टेंबरपासून या चित्रपटाचे काम करणार होती. परंतु सध्या तरी या चित्रपटाचे काम पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
ही गोष्ट बॉलीवूडमध्ये काही पहिल्यांदाच घडलेली नाही. चित्रपट मोठ्या उत्साहाने जाहीर केले जातात आणि नंतर डब्यात जाऊन पडतात. कधी बजेट हे त्यामागील कारण असते तर कधी स्टार कास्ट. केवळ नवीन निर्माते, दिग्दर्शक किंवा अभिनेते-अभिनेत्रींचे चित्रपटच डबाबंद झाले आहेत असे नाही. तर सलमान खान, आमीर खान एवढेच नव्हे तर मेगास्टार अमिताभ बच्चन यांचेही चित्रपट डबाबंद झाल्याची उदाहरणे आहेत.
दिग्दर्शक शशांक खेतान यांनी धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली तरुण धवनसोबत “रणभूमी’ चित्रपटाची घोषणा केली होती. परंतु नंतर त्यांनी तो चित्रपट पुढे ढकलला. सध्या तरी या चित्रपटाबद्दल काहीच ऐकायला मिळत नाही. संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या “इन्शाल्लाह’ या चित्रपटात सलमान खान आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत असतील हे निश्चित झाले होते.
परंतु आता अन्य कोणत्यातरी कलावंतांना घेऊन संजय लीला भन्साळी हा चित्रपट करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशा अफवांना मध्यंतरी जोर चढला होता. परंतु सध्या तरी या चित्रपटाची चर्चाच नव्हे तर कामही बंद आहे.
सलमान खान आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असणारा “दस’ हा चित्रपट आजतागायत अपूर्णच राहिला आहे. वस्तुतः या चित्रपटाच्या निर्मितीस प्रारंभ झाला होता. परंतु ही प्रक्रिया सुरू असतानाच दिग्दर्शक मुकुल आनंद यांचे निधन झाले. या कारणामुळे चित्रपट डबाबंद झाला. सलमान आणि संजूबाबासोबत या चित्रपटात रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी प्रमुख भूमिकांत झळकणार होत्या.
“शुद्धी’ नावाच्या आपल्या “ड्रीम प्रोजेक्ट’ची घोषणा करण जोहर यांनी मोठ्या दिमाखात केली होती. सुरुवातीला हृतिक रोशन यात मध्यवर्ती भूमिका साकारणार होता. नंतर सलमानच्या नावाचा विचार झाला आणि शेवटी वरुण धवनच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. परंतु दुर्दैवाने हाही चित्रपट डबाबंदच झाला आहे. “तालिसमान’ या चित्रपटात तर मेगास्टार अमिताभ बच्चन भूमिका करणार होते. या चित्रपटाचा टीजरसुद्धा रिलीज करण्यात आला होता. परंतु या चित्रपटाचे कामही बंद पडले.
“पॉवर’ या चित्रपटात आधी अजय देवगण दिसणार होता. नंतर त्याला हटवून संजय दत्तला घेण्यात आले होते. परंतु नंतर संजय दत्तला तुरुंगवासात जावे लागले आणि चित्रपटही बंद पडला. चाकोरीबाहेरचे चित्रपट देणारे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी आमीर खानला घेऊन “मिस्टर इंडिया’चा सिक्वेल काढण्याचे ठरविले होते. या चित्रपटाचे नाव होते “टाइम मशीन’!
आमीरसोबत चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि रवीना टंडन प्रमुख भूमिका साकारणार होते. परंतु हा चित्रपट कधी, कुठे गेला आणि परत येणार का, हे पाहायला “टाइम मशीन’च आणायला हवे. काजोल आणि गोविंदा यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या “जंगली’ या चित्रपटाचेही असेच झाले. राहुल रवैल या दिग्दर्शकाने हा चित्रपट हाती घेतला होता. गोविंदा आणि काजोलचे या चित्रपटाच्या संदर्भाने केलेले फोटोशूटही चर्चेत आले होते.
परंतु त्यानंतर अचानक हा चित्रपट सुरू होण्याआधीच बंद पडला. आमीर खानचा “सरफरोश’ सर्वांना ठाऊक आहेच. परंतु काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असणारा एक चित्रपट “सरफरोश’ याच नावाने पडद्यावर येणार होता. बिग-बींसोबत परवीन बॉबी, ऋषी कपूर आणि कादर खान या चित्रपटात भूमिका करणार होते.
परंतु त्यानंतर अनेक वर्षांनी अमीरचा “सरफरोश’ झळकला तरी अमिताभ यांच्या “सरफरोश’चा पत्ताच नाही! अमिताभ यांचाच रेखासमवेत “अपना पराया’ हा चित्रपट पडद्यावर येण्याची प्रतीक्षा काही वर्षांपूर्वी रसिकांना होती. काही दिवसांचे चित्रीकरणही झाले होते. परंतु अचानक एके दिवशी हाही चित्रपट डबाबंद करण्यात आला.