भारतीय क्रिकेटपटूंनी करोनाच्या बाधेपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा आग्रह धरत इंग्लंडविरुद्धची मॅंचेस्टरला होणारी पाचवी कसोटी रद्द करायला भाग पाडले आणि संपूर्ण इंग्लंडमध्ये पोटशूळ निर्माण झाला. बात का बतंगड कसे बनवायचे हे इंग्लंड व ऑस्ट्रेलियाकडून शिकण्यासारखे आहे.
आता ही कसोटी का रद्द झाली, त्यामागे खरे कारण काय आहे. आयपीएलचा त्याच्याशी काय संबंध आहे यावर कवित्व सुरू झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मैदानावरील खेळापेक्षा आरोप-प्रत्यारोपांचीच कसोटी सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
खरेतर या कसोटी मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वीच बीसीसीआयने ही मालिका चार कसोटींचीच असावी असे मत व्यक्त केले होते. मात्र, करोना काळात इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाला (ईसीबी) झालेले नुकसान काही प्रमाणात भरून काढले जाईल या हेतूने ही मालिका पाच सामन्यांची खेळवली जाणार असे ठरले.
नॉटिंगहॅमचा पहिला सामना पावसाने अनिर्णित राहिला. लॉर्डसवरचा दुसरा सामना भारताने जिंकला. त्यानंतरचा हेडिंग्लेचा सामना इंग्लंडने जिंकत मालिकेत बरोबरी केली. भारतीय संघाने अफलातून पुनरागमन करत ओव्हलचा सामना जिंकला व मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. दरम्यान, रवी शास्त्री यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले व तिथेच ठिणगी पडली. याच कार्यक्रमात शास्त्रींना करोनाची बाधा झाली व त्यांच्यामुळेच भरत अरुण व नितीन पटेल हे देखील बाधित आढळले.
झाले! संपूर्ण मालिकेचा नूरच पालटला. या तिघांनाही विलगीकरणात पाठवले गेले. मात्र, सहाय्यक फिजीओ योगेश परमारदेखील करोनाबाधित आढळले, ते देखील पाचव्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी. त्यामुळे परमार यांच्या संपर्कात आलेल्या भारतीय संघातील क्रिकेटपटूंनी धसकाच घेतला. कारण या दीर्घकालीन दौऱ्यावर या खेळाडूंसह त्यांचे कुटुंबीयही होते त्यामुळे कोणताही धोका पत्करण्याची तयारी खेळाडूंची नव्हती. त्यामुळे त्यांनी बीसीसीआयला विनंती करत हा सामना रद्द करण्याची गळ घातली व आगामी आयपीएल
स्पर्धेचे महत्त्व जाणून हा सामना रद्द केला गेला.
खरेतर यात गैर काहीच नाही. कारण ज्या कमाईच्या हेतूने ईसीबीने ही मालिका चार ऐवजी पाच कसोटींची खेळवावी असा आग्रह धरला होता तोच कमाईचा हेतू बीसीसीआयने ठेवला तर काय आभाळ कोसळले? पण यात एक मेख आहे. ईसीबीने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला हाताशी धरत आता पुन्हा एक कुटील कारस्थान हाती घेतले आहे. इंग्लंडचा संघ लवकरच पाकिस्तानचा दौरा करत आहे.
या मालिकेत इंग्लंड संघातील जे खेळाडू टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत त्यांना या मालिकेत खेळणे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजे हेच खेळाडू भारताच्या आयपीएल स्पर्धेत विविध संघांकडून खेळत असल्याने त्यांच्या माघारीने आयपीएलला पर्यायाने बीसीसीआयला आर्थिक फटका बसेल हाच त्यामागचा हेतू आहे.
दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेटची अवस्था म्हणजे “कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन’ अशी झाली आहे. आता त्यांच्या मंडळावर भारतप्रेमी रमीझ राजा यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांना थोडाफार आशेचा किरण दिसू लागला आहे. मात्र, परकीय शक्तींच्या हातातील बाहुले होण्याची त्यांची प्रवृत्ती अद्याप कायम आहे.
असो, पाचवी कसोटी का रद्द झाली, याचे खरे कारण पुढील काळात समोर येईलच. मात्र, त्यावरून सुरू झालेली आरोप-प्रत्यारोपांची कसोटी चांगलीच रंगणार आहे. आता बीसीसीआय येत्या काळात इंग्लंड मंडळाला नवा प्रस्ताव देईल. पाचवी कसोटी रद्द केल्यानंतर त्यांना जितक्या रकमेचा फटका बसला त्याच्या दसपट जास्त रकमेचा प्रस्ताव इंग्लंड मंडळ निश्चितच स्वीकारेल. कारण या काळात जागतिक क्रिकेटची सगळी सूत्रे बीसीसीआयच्या हाती आहेत. त्यामुळे जर भारतीय संघ मालिका खेळणार असेल तरच प्रचंड आर्थिक लाभ होतो हे न कळण्याइतके इंग्लंड मंडळ “ढ’ नाही.
मधल्यामध्ये पाकिस्तान मंडळाची अवस्था मात्र अधांतरीच अशी होणार यात शंका नाही. सातत्याने दुसऱ्याच्या सांगण्यावरून वागायचे व अस्तित्व गमावून बसायचे ही खोड त्यांना सातत्याने भोवत आहे; पण सुधारणेची शक्यता शून्य आहे. मॅंचेस्टर कसोटी रद्द झाली व त्यावरून जागतिक क्रिकेटची सूत्रे भारताच्या हातातून काढून आपल्या हाती घेण्याचे इंग्लंडचे हे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत हे माहिती असूनही सध्या अनावश्यक मतमतांतरे सुरू आहेत. त्यात इंग्लंड मंडळाला त्यांच्या माजी क्रिकेटपटूंचीही साथ मिळत आहे.
एक गोष्ट ते विसरत आहेत की, भारतीय संघाने साथ दिली नाही तर त्यांचे मंडळ, त्यांचे आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रकच नव्हे तर त्यांचे अस्तित्वही संपायला वेळ लागणार नाही. जागतिक क्रिकेटमध्ये आज असा एकही संघ नाही जो भारतीय संघाची बरोबरी करू शकतो. पूर्वी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रसिद्ध ऍशेस कसोटी मालिकेला जितके प्रेक्षक असायचे ते पाहून आपल्याला हेवा वाटायचा. आज आपल्या आयपीएलला जितके प्रेक्षक असतात ते पाहून इंग्लंडचेच नव्हे तर जगभरातील खेळाडू या स्पर्धेत खेळण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे मॅंचेस्टर कसोटीवरून सुरू झालेले कवित्व लवकर संपवणेच इंग्लंड मंडळासाठी सोयीस्कर व श्रेयस्करही ठरेल यात शंका नाही.
अमित डोंगरे