मुंबई – महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती उत्सुक होते. संभाजीराजेंनी ही निवडणूक अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र यासाठी सर्वपक्षांनी मिळून आपल्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले होते. दरम्यान त्यांना उमेदवारीही द्यायची नाही त्यांना विरोधही करायचा नाही, अशी भूमिका सर्व पक्षांनी घेतल्याचे दिसून आले. शिवसेनेनेकडून पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवण्यात आली होती.
ते संभाजीराने यांना मान्य नव्हते अखेर शिवसेनेने कोल्हापुरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी दिली. त्यानंतर आज संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची मोठी घोषणा केली आहे. सध्या यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आता भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात येत आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे की,’संभाजीराजेंच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ‘सारथी’ला नवी मुंबईत भूखंड देण्याचा प्रस्ताव ठाकरे सरकारने कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला आहे. ठाकरे सरकारचे हे लबाडा घरचे अवताण आहे. बूँद से गई सो हौद से नहीं आएगी।’ असं म्हणत वाघ यांनी हल्लाबोल केला आहे.