मुंबई : शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा नाकारल्यानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघत असल्याचे दिसत आहे. आज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत ही राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगत य निवडणुकीतून माघार घेतली. दरम्यान, यासर्व घडामोडीनंतर मनसेने पहिली प्रतिक्रिया शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.
संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर मनसे नेते गजानन काळे यांनी ट्वीट करत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. “छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणं वेदनादायक होतं. उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्यांना मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात “शिव” वापरायची लायकी नाही असेच म्हणावे लागेल. आदरणीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत”, असे गजानन काळे म्हणाले आहेत.
छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणे वेदनादायक होते
उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात “शिव” वापरायची लायकी नाही असेच म्हणावे लागेल.
आदरणीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत.— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 27, 2022
दरम्यान, शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजे यांनी “मला इतकं वाईट वाटतंय. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द मोडला. ‘स्वराज्य’ बांधण्यासाठी मी सज्ज झालो आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे. २००९ मध्ये लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांनी प्रेम दिलं. लोकांची इच्छा होती की सगळ्यांना संघटित करा. मला आज मिळालेली ही संधी आहे. माझी स्पर्धा माझ्याबरोबर आहे. म्हणून या विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी, गोरगरीबांना न्याय देण्यासाठी मी ‘स्वराज्य’च्या माध्यमातून उभा राहणार आहे”, असे म्हटले.
राज्यसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर केला होता. मात्र, शिवसेनेच्या भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपतींनी ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. “ज्या आमदारांनी ड्राफ्टवर सह्या केल्या, त्या आमदाराचे मनापासून आभार व्यक्त करतो. आयुष्यभर मी त्यांच्या पाठिशी राहणार आहे. त्यांनी केव्हाही हाक द्यावी. शिवसेनेनं मला ऑफर दिली होती. पक्षात प्रवेश करा आणि खासदार व्हा. पण मी सांगितलं होतं की मी जाणार नाही. कालपासून अनेक आमदारांचे फोन आहेत की कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवायचीच. पण मला कल्पना आहे की यात नक्कीच घोडेबाजार होणार. घोडेबाजारासाठी माझी उमेदवारी नाही. सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी अशी अपेक्षा होती. पण ते होताना दिसत नाही. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी ही निवडणूक लढणार नाही. पण ही माघार नाही. हा माझा स्वाभिमान आहे”, असे संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.